पुणे- खमके नेतृत्व नसल्यानेच पुणे महापालिकेत सावळा गोंधळ कारभार असून विकास कामांना नियोजना अभावी गती मिळालेली नसल्याचा आरोप आज येथे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला .त्याच बरोबर आपण लोकसभेची निवडणूक लढविणार असून जनतेला उत्तरदायी असू असे त्यांनी वक्तव्य केले आहे . खासदार काकडे यांच्या या वक्तव्यांनी राजकीय धुराळा उठणार आहे . एकीकडे भाजप मला उमेदवारी देईलच असे ते म्हणत असले तरी .. त्यांचा निर्धार हा कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचाच दिसत आला आहे. त्यांनी सुरु ठेवलेल्या सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीतून हा निर्धार प्रसंगी उमेदवारी नाकरली तर भाजपला आव्हान देणारा ठरेल काय हे आता पाहावे लागणार आहे .
राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी विधानसभा मतदार संघनिहाय भेटीगाठीस सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून खासदार काकडे आज वडगावशेरी मतदार संघात आले होते. नगररोड कट्ट्यावर मान्यवरांशी विविध विषयांवर चर्चा, दत्त जयंती उत्सवाला उपस्थिती आणि मतदार संघातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. खासदार काकडे यांच्या या झंझावती दौऱ्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात वडगावशेरी मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
नगररोड कट्ट्यावर मनसेचे बाबु वागस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे, भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, भीमराव गलांडे, सुनील मलके, नितीन भुजबळ, नानासाहेब नलावडे, दयानंद अडागळे, रमेश सकट, राजकुमार ढाकणे, जितेंद्र भोसले, मोहन शिंदे, रमेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. कट्ट्याला भेट दिल्यानंतर नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरुजी यांनी आयोजित केलेल्या दत्त जयंती उत्सवाला भेट दिली. त्यानंतर वडगावशेरी मतदार संघातील भीमराव गलांडे व नारायण गलांडे यांच्या घरी भेट दिली.
व्यावसायिक व्यक्तीला प्रोफेशनलपणे काम करण्याची व कमिटमेंट पाळण्याची सवय असते. त्यामुळे व्यावसायिक व्यक्ती राजकारणात आली तर, जुमलेबाजी न करता प्रोफेशनली काम करण्यावर त्यांचा भर असतो, असे खासदार काकडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. याविषयी खासदार काकडे यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर पुणे महापालिकेत सावळा गोंधळ सुरु आहे. खमक्या नेतृत्व नसल्याने आणि कामांचे नियोजन होत नसल्याने पुण्यातील विकासकामांना अपेक्षित ती गती मिळत नाही, असे सांगून विकासाची कामेच यापुढचं राजकारण ठरवतील, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.
लोकसभेतून निवडून आल्यानंतर मी जनतेला उत्तरदायी असेल. त्यामुळे पुण्याच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. खासदार झाल्यानंतर एका वर्षात पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार. मध्यवर्ती पेठांसह सर्व उपनगरांना मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुरेसा पाणीपुरवठा शक्य आहे. फक्त त्यासाठी नियोजन करुन निर्णय घेण्याची गरज आहे, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.
खासदार काकडे यांच्या वडगावशेरी मतदार संघातील भेटीगाठीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.