पुणे- महापालिकेतील मिळकत कर विभागातील नागरी सुविधा केंद्रात रंगेहाथ पकडला गेलेला तोतया गुन्हा दाखल होवून महिना उलटला तरी अद्यापही पोलिसांना दाद देत नसून या मागे त्याचे साथीदार असलेले पालिकेतील साथीदार आणि मूळ सूत्रधार यांचाच हाथ असल्याचा आरोप होतो आहे . १९ जुलै रोजी हा तोतया मायमराठी च्या सहाय्याने कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे , अविनाश बागवे यांनी रंगेहाथ पकडला होता. विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी या कारवाईबद्दल संपूर्ण टीम चे अभिनंदन केले होते . तर दुसऱ्या दिवशी २० जुलै ला महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखला करण्याचे आदेश दिले होते .
आज त्या घटनेला महिना होत आहे . पण या तोतया ला अटक झालेली नाही अगर त्याचा साधा जबाब हि पोलिसांनी घेतलेला नाही . या उलट हा तोतया ज्यांच्या सहवासात काम करत होता त्या महापालिका कर्मचाऱ्यांचे जबाब मात्र पोलिसांनी घेतले आहेत . आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर चक्क १५ दिवसांनी आरोपीने रोख रकमेचा अटकपूर्व जामीन घेतला आहे . त्यानंतर आता येत्या रविवारी त्याचा जबाब पोलीस घेणार आहेत . तपासाची हि पद्धतच बोलकी आहे,
दरम्यान या प्रकरणानंतरज्याठिकाणी हा तोतया पकडला गेला त्या कार्यालातील खुद्द फिर्यादी असलेले प्रशासन अधिकारी गिरीश पत्की, तसेच दयानंद सोनकांबळे ,वैभव कडलग या सर्वांची बदली करून प्रशासनाने मोठा हादरा दिला आहे . या सर्वांच्या बदलीमागे त्यांची इथे 3 वर्षांची सेवा झाल्याचे कारण देण्यात येते आहे . एवढेच नाही तर याच नागरी सुविधा केंद्रातील अन्य 2 महिला आणि काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . यातील काहींच्या बदल्या ९ महिन्यापूर्वीच आरोग्य खात्यात झाल्या होत्या . मात्र बदल्या होवूनही हे बदलीच्या ठिकाणी रुजू न होता बिनपगारी येथे काम करीत होते .मात्र या प्रकरणानंतर तातडीने त्यांनी बदलीच्या ठिकाणी धाव घेतली.
पोलिसांनी अशाच कर्मचाऱ्यांचे जबाब घेवून आरोपीला सहाय्य होईल असे काम सुरु ठेवल्याचा आरोप होतो आहे . गुन्हा दाखल होवूनही १५ दिवस आरोपीला पकडले जात नाही .रंगेहाथ पकडूनही आरोपीला थेट महापालिका प्रशासन पोलिसांच्या ताब्यात देत नाही. गुन्हा दाखल होवून महिना उलटला तरी आरोपीचा जबाब सुद्धा पोलीस घेवू शकलेले नाहीत . ज्या खात्यात आरोपी पकडला त्या खात्यातील प्रमुखांचा जबाब पोलिसांनी घेतला नाही .या सर्व बाबींमागे पोलिसांची निष्क्रियता आहे कि महापालिकेतील आणि पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या तथाकथित संगनमताचा दबाव आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे .
दरम्यान महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकारी विलास कानडे, तसेच तुषार दौंडकर अशा अधिकाऱ्यांची एक समिती नेमली असून या समितीने अद्याप याप्रकरणी केलेल्या चौकशीची माहिती जाहीर केलेली नाही .