नक्षत्र ,बांबू उद्यानासह सात संकल्पनाधारित उद्याने ,महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा केंद्र
तळजाई वर नव्याने सात लाख वृक्षांची होणार लागवड ;वाढत्या रहदारीमुळे सोलर रूफ पार्किंग -आबा बागुल
पुणे –
वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी नागरीक यांच्या सहभागाने तळजाई टेकडी परिसरात पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प पर्यावरणाच्या निकषानुसारच पुणे महानगरपालिका व माझ्या संकल्पनेतून साकारला जात आहे. या प्रकल्पासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नाही . उलट नव्याने सात लाख वृक्षांची लागवड होणार आहे. मात्र आगामी निवडणूका आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी काही विघ्नसंतोषी लोकं या प्रकल्पाबाबत दिशाभुलीचे राजकारण करीत आहेत,त्याला नागरिकांनी थारा देऊ नये असे आवाहन माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केले.
याबाबत माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक आबा बागुल म्हणाले कि, तळजाई टेकडी येथे सिमेंट रस्त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे, परिणामी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा बसावा आणि शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य ,वन्यजीव अधिवासासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी जैववैविध्य उद्यानाचा महत्वपूर्ण प्रकल्प नियमानुसार होत आहे. त्यानुसार नुकतेच पर्यावरणपूरक सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नियोजित नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, सोलर रूफ पार्किंगचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे कामही सुरु झाले आहे;पण निवडणुका आणि वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकं पर्यावरणाच्या नावाखाली या प्रकल्पाच्या कामाला अडथळा निर्माण करीत आहे.पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या या प्रकल्पावरील कामगारांना मारहाण करीत आहेत. सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यामुळे संबंधित कथित पर्यावरण प्रेमी त्यातून वृक्षतोड होत असल्याचा आरोप करीत असून फ्लेक्सबाजीतून अन्य ठिकाणाचे छायाचित्र टाकून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले.
सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी , १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे.या सोलर रूफ पार्किंग येथे नागरिकांनी वाहने लावायची आणि तिथून व्यायामासाठी, फिरण्यासाठी जावे असे नियोजन वन्यजीव अधिवासाच्या संरक्षणासाठी आहे.
नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यात नक्षत्र आणि बांबू उद्यान, सोलाररुफ पार्किंग याचे काम सुरु होत आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरु केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही होत आहे. [यापूर्वी येथे पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते.] त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, महिलांसाठी स्वतंत्र क्रिडांगण , सांस्कृतिक क्षेत्राला वाव देण्यासाठी अँफी थिएटर, रेन वटर हार्वेस्टिंगद्वारे तळ्यांची निर्मिती, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर्क स्टेशन्स, रोजगार निर्मितीसाठी तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू; अथवा अन्य उपक्रमांसाठी खुले प्रदर्शन केंद्र, रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीला चालना देणारा प्रकल्प होणार आहे आणि उत्पादित शेतमालासाठी तेथेच विक्री केंद्र, मध्यवर्ती भागात पर्यटकांसह नागरिकांसाठी ’मार्केट प्लेस’, पक्ष्यांच्या अभ्यास व निरीक्षणासाठी ’गाईड विथ टूर’ हा महत्वाचा प्रकल्पही या आराखड्यात आहे. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकं नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी वृक्षतोड होत असल्याचा आरोप करून विकासकामांना अडथळा आणण्याचे षडयंत्र करीत आहेत. केवळ शहरच नाही तर राज्याला तळजाईवरील जैववैविध्य उद्यान प्रकल्प आदर्शवत ठरणार आहे. असेही आबा बागुल यांनी नमूद केले.
आता वर्षभर तळजाई टेकडी राहणार हिरवीगार
आबा बागुल पुढे म्हणाले,’या प्रकल्पासाठी कै. वसंतराव बागुल उद्यानात साकारलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातील शुद्ध पाणी येथे आणण्यात आले आहे. आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार तर आहे तसेच यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा होणारा वापर पूर्णतः थांबला आहे. एकप्रकारे पिण्याच्या पाण्याची बचत खऱ्या अर्थाने होणार आहे आणि वन्यजीव अधिवासासह पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.