पुणे :महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी , नगरसेवक सुनील कांबळे यांना सलग दुसर्यांदा संधी मिळाल्यानंतर अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असताना ,लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील जातीय समीकरणाचा विचार झाल्यास मराठा समाजाला आता अध्यक्ष पद दिले पाहिजे अशी मागणी जोर धरत असून त्या अनुषंगाने उमेश गायकवाड ,राजेंद्र शिळीमकर, दिलीप वेडे पाटील,हेमंत रासने हेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत पुढे आले आहेत आणि त्यांनी आपल्या दृष्टीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे . याच पार्श्वभूमीवर आज खा.काकडे समर्थक म्हणून गणले जाणारे शिळीमकर यांनी बापट यांची भेट वेडे पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातच घेण्याचा प्रयत्न केल्याने यावेळी उपस्थित असलेल्या स्थायीच्या माजी अध्यक्षाने ‘काय फिल्डिंग काय ‘ म्हणून थेट उल्लेख केला .
स्थायी चे अध्यक्षपद भाजपकडे आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त होणार्या सदस्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार, कि जुन्या सदस्यांमधून कोणाची वर्णी लागणार यावर मंथन होते आहे .भाजपने तीन ज्येष्ठ नगरसेवकांना एकाच वेळी संधी दिल्याने आता अध्यक्षपदासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे.
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना सलग दुसर्यांना संधी मिळाली आहे. तब्बल पाच टर्म नगरसेवक असलेल्या कांबळे यांची गतवर्षी अध्यक्षपदाची संधी हुकली. त्यामुळे ते यावर्षी पुन्हा प्रयत्नशील होते. आता स्थायी समितीत त्यांच्या पुनरागमनामुळे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
पालिकेत सद्यःस्थितील महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष ही महत्त्वाची पदे मानली जातात. त्यामध्ये केवळ स्थायीचे अध्यक्षपद योगेश मुळीक यांच्या रूपाने सध्या मराठा समाजाकडे आहे. त्यात आता या पदावर अन्य समाजाला संधी मिळाल्यास मराठा समाजाकडे एकही महत्त्वाचे पद राहणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
त्यामुळे मराठा समाजाचा विचार झाल्यास शिळीमकर यांच्यासह गायकवाड,वेडे पाटील यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने राजकीय समीकरणे झाल्यास कांबळे यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा वर्षभराची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यात चालू वर्षात होणारे महापौरपदाचे आरक्षण महत्त्वाचे ठरणार असून त्यावर पुढील राजकीय गणिते बदलणार आहेत.
त्याचबरोबर पक्षात ज्येष्ठ असलेले रासनेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील प्रमुख उमेदवार मानले जात आहेत.
स्थायी समितीतील भाजपचे सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन अशा आठ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची गुरुवारी मुख्य सभेत निवड करण्यात आली. त्यामध्ये रिपाइंला एक जागा देताना भाजपने पक्षीय समतोल साधला आहे. लोकसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेवून भाजपने वडगाव शेरी वगळता अन्य पाच विधानसभा मतदारसंघांतील सदस्यांना संधी दिली आहे. भाजपच्या सहा सदस्यांसाठी प्रत्येक आमदाराला एका नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यात शिळीमकर यांचे नाव आमदार तसेच शहरातील नेत्याकडून देण्यात आले नव्हते. मात्र, शिळीमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच वर्णीसाठी प्रयत्न केले आणि थेट त्यांच्या कोट्यातून स्थायी समितीत वर्णी लावत अन्य इच्छुकांना धक्का दिला.आता पुन्हा काकडे यांच्यामार्फत सीएम कोट्यातून स्थायीचे अध्यक्षपद जाणार कि, सीएम यांनाच गिरीश बापट यांच्या मताचा आता विचार करावा लागणार ? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. शेवटी भाजपचे स्थानिक नेतृत्व पालकमंत्री आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडे असले तरी ,पुणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय काहीही होत नाही हे वास्तव आहे . अध्यक्षपदाच्या या शर्यतीतील कोणाच्या गळ्यात सीएम माळ घालतील हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे .