पुणे- उद्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थानिक आमदाराच्या पुढाकारातून करण्याचा प्रकार म्हणजे या आमदाराच्या ‘उद्योगांवर ‘पांघरून घालू पाहण्याचा प्रकार आहे . दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे अशी टीका राष्ट्रवादीचे कात्रज येथील नगरसेवक प्रकाश कदम यांनी केली आहे.
ते म्हणाले माझ्या पत्नीने म्हणजे भारती कदम यांनी नगरसेवक असताना या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने 9 वेळा निवेदने देत या कामाचा पाठपुरावा केला एवढेच नव्हे तर खुद्द अजितदादा पवार यांच्या कानावर येथील समस्या घालून या प्रकरणी तातडीने बैठक लावली आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी याप्रकरणी प्राथमिक १५ कोटीची सर्वप्रथम तरतूद करून या कामाला प्रारंभ केला . पुन्हा त्यासाठी आम्ही भाजपची सत्ता आल्यावर आंदोलनेही केली .आता हे काम अंतिम टप्प्यात येवून कामाचा प्रारंभ होत असताना निव्वळ श्रेय लाटण्यासाठी स्थानिक आमदाराच्या पुढाकाराने भूमिपूजनाचा घाट घालून आमदाराच्या उद्योगांकडे दुर्लक्ष कसे होईल यासाठी भूमिपूजनाचा समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येतो आहे .वास्तविक पाहता राष्ट्रवादीने या कामासाठी केलेले सर्व प्रयत्न यामुळेच या कामाला प्रारंभ होणार आहे असेही ते म्हणाले .