-दिवाळीनंतर प्रत्यक्षात पाणीकपात –
पुणे- गेल्या 6 वर्षापासून महापालिकेकडे खडकवासला पाणीपुरवठा प्रकल्पातून घेण्यात येणाऱ्या पाण्याच्या बिलापोटी ची थकीत रक्कम किती याचा वाद प्रलंबित असताना , पाणी कपातीची तलवार टांगती ठेऊनच नाक दाबून आज पालिकेकडून ६५ कोटी रुपये पाटबंधारे खात्याला मिळविण्यात यश आले . जायका प्रकल्पासाठी केलेल्या ६५ कोटीच्या तरतुदीतून हि रक्कम वर्ग करून पाटबंधारेला देण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या मुख्य सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर संमत केला . यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने हि रक्कम पाणी पट्टीची बड्या बड्या उद्योगांकडून येणे असलेली सुमारे १०० कोटीची थकबाकी वसूल करवून द्यावी अशी मागणी केली होती .मात्र भाजप आणि सेनेने ती धुडकारून लावत हा प्रस्ताव मंजूर केला .
दरम्यान कालवा फुटीनंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिका रोज 1 हजार 350 एमएलडी पाणी घेत आहे. सध्या पाणी कपात नाही. मात्र दिवाळीनंतर रोज एकवेळ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे, अशी माहिती पाणी पुरवठयाचे अधिकारी प्रविण गेडाम यांनी दिली ,ते म्हणाले, कालवा फुटीनंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिका रोज 1 हजार 350 एमएलडी पाणी घेत आहे. सध्या पाणी कपात नाही. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळित होईल. मात्र दिवाळीनंतर रोज एकवेळ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पाणी पुरवठयाबाबत उदया सर्वपक्षनेत्याची बैठक बोलविली आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट जलशुध्दीकरणकेंद्राला गळतीमुळे जास्त पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा कमी होतो. पर्वती ते कॅन्टोन्मेंट जलकेंद्रादरम्यानची 2 हजार 200 मिलीमीटर व्यासाची बंदिस्त पाईपलाईनचे काम नोव्हेबर अखेर पर्यत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पाण्याची गळती थांबणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रविण गेडाम यांनी सांगितले.
यावेळी पाणी कपातीचा धाक दाखवून ,टांगती तलवार ठेऊन ,ब्लॅकमेल करून सरकार पालिकेकडून पैसे उकळीत असल्याची तक्रार दिलीप बराटे ,चेतन तुपे ,अविनाश बागवे ,अरविंद शिंदे आदींनी केली .
सुरुवातीला ३५२ कोटी येणे आहे असे पाटबंधारे ने कळविले नंतर आक्षेप घेतल्यावर हि रक्कम १५४ कोटीवर आली .आणि आता त्याहूनही थकीत रक्कम कमी आहे असा दावा पालिका प्रशासनाने केल्याने हा वाद प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. पण सध्या यावर निर्णय लागेपर्यंत ६५ कोटी घ्या आणि शांत बसा असे धोरण स्वीकारत हा प्रस्ताव आणण्यात आला . या साठी जायका प्रकल्पासाठी केलेली तरतूद वर्ग करण्यात आली . शहराच्या पर्यावरणासाठी जायका प्रकल्प महत्वाचा असून , पाटबंधारेला द्यायचेच आहेत तर ,पाणीपट्टी पोटी बड्या उद्योगांकडून पालिकेला येणे असलेली सुमारे १०० कोटीची रक्कम वसूल करा आणि ती द्या ,पण ३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जायका चे पैसे वर्ग करू नका अशी भूमिका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली . दरम्यान सर्व पक्षातील नगरसेवकांकडून, एकीकडे पाणीकपातीची तलवार पाटबंधारे ठेवत असल्याने रोष व्यक्त करण्यात आला. तर थकीत रकमेचा योग्य हिशेब लावावा अशी मागणीही करण्यात आली . तर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ,थकबाकी द्यायचीच आहे ,जायका साठी ठेवलेले ६५ कोटी मार्च अखेरपर्यंत खर्च होणे शक्य नसल्याने हि रक्कम वर्ग करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आणि हि रक्कम दिल्याने जायका प्रकल्पाच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही जानेवारीत जायका च्या कामाला गती येईल असे ते म्हणाले .