प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्थापालक पुरस्कार
डीपर व सर फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा 27 व 28 जुलै रोजी वितरण समारंभ
पुणे, दि. 15 : डीपर आणि सर फाउंडेशन या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा महापालक सन्मान पुरस्कार यावेळी प्रसिद्ध विचारवंत व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेले डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना तर, संस्थापालक सन्मान पुरस्कार मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्वस्त प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती डीपर व सर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिश बुटले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महापालक पुरस्काराचे हे सातवे वर्ष व संस्थापालक पुरस्कारचे हे चौथे वर्ष आहे. येत्या 27 जुलै (शनिवार) रोजी संस्थापालक व 28 जुलै (रविवार) रोजी महापालक पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील कोथरुडमधील जे पी नाईक जे पी नाईक ट्रेनिंग सेंटरमध्ये सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. महापालक सन्मानासाठी निवड झालेले डॉ. गणेश देवी यांनी आदिवासींसाठी व भाषा संवर्धनासाठी असामान्य असे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची यंदाच्या महापालक सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्रासहित सन्मानचिन्ह आणि सौभाग्यलेणं असे आहे. यापूर्वी हा सन्मान डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. कुमार आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, दिलीप व सुनीता अरळीकर, डॉ. राजाभाऊ व रेणुताई दांडेकर आणि भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीना सिंह यांना प्रदान करण्यात आला आहे.
संस्थापालक सन्मान पुरस्कारासाठी अतिशय निस्पृहपणे संस्थेचे पालकत्व निभावणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झालेले प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळ व विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थांसाठी अतिशय भरीव कार्य केले आहे. या पुरस्काराचे स्वरुप 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार नाशिक जिल्हा प्रसारक समाजाच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव, वरोऱ्याच्या ज्ञानदा वसतिगृहाचे संस्थापक मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थिती असते. पुरस्कार वितरण समारंभाबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक घडामोडी व विकासासंदर्भातील परिसंवादाचेही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असेही हरीश बुटले यांनी म्हटले आहे.