पुणे : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते सामाजिक जाणिवेतून केले जाते. त्यामुळे रक्ताची उपलब्धता व त्यासंबंधीचा व्यवसाय हा देखील सामाजिक जाणिवेतूनच व्हायला हवा. मात्र, रक्तांच्या पिशव्यांचे सध्याचे दर हे अवाजवी आहेत. दोन हजार रुपयांपर्यंत रक्ताच्या पिशवीची विक्री होते. हा प्रकार बेकायदेशीर व सामाजिक जाणिवेला काळिमा फासणारा आहे. म्हणून रक्तहितवर्धिनी याविरोधात आंदोलन पुकारणार असून आम्ही सरकारच्या विरोधात जनतेत जाणार आहोत व जनजागृती करणार आहोत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान मोदी ते पालकमंत्री बापट यांच्यापर्यंत अर्ज विनंत्या करुन त्यांना कळत नसेल तर, येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जनतेमध्ये सरकारची रक्तदानाविषयीची उदासिनता उघड करणार आहोत. सरकारमधील मंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी आम्ही जाणार व रक्तदानाबद्दलचा सरकारचा नाकर्तेपणा उघड करणार, असे शिंदे म्हणाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील, शंकर पवार, दिलीप इंगळे, धनंजय झुरंगे, समीर पवार, राजाभाऊ यादव, मुकेश पोटे, यादव पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून अनेक सामाजिक संस्था रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. रक्तपेढ्यादेखील यामध्ये सहभागी होतात. मात्र, रक्तदात्याला आमिष दाखवून रक्तदान शिबिर होऊ नये. कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. आमिष देण्याचे प्रकार रक्तपेढ्यांकडून किंवा इतरांकडूनही केले जातात. त्यामुळे संबंधीत आमिषाचा खर्च भरुन काढण्याचा प्रकार रक्त पेढ्यांकडून होत असतो. परिणामी रक्ताच्या पिशव्या सांभाळण्याची किंमत कमी असतानादेखील वाढीव दराने रक्ताच्या पिशव्यांची विक्री होत आहे. हा प्रकार तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि अन्नधान्य व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना सविस्तरपणे लिखित स्वरुपात सांगितला आहे, असे शिंदे म्हणाले.