माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन
‘आऊसाहेब’ पुरस्काराचे वितरण
पुणे, : राजमाता जिजाऊंनी पती शहाजीराजे, सुपूत्र शिवाजीराजे व नातू संभाजीराजे अशा तीन पिढ्यांसोबत काम केले. यावेळी त्यांनी सर्वगुण संपन्न स्वराज्य निर्माणासाठी कार्य केले. त्यामुळे आजच्या माता-भगिनींनी जिजाऊंचा आदर्श घेतल्यास सर्वगुण संपन्न समाजाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
आदिशक्ती फाउंडेशनच्या वतीने समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘आऊसाहेब’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार राजमाता जिजाऊंच्या नावाने दिला जातो. यावेळी रक्तदाब मोजण्यासाठी लागणारा स्फिग्मोमिटर आणि त्यासाठीची पिशवीची निर्माण करणाऱ्या डायमंड ग्रुपच्या सुलभा भाटे, मधुमेही रुग्णांची औषधांपासून मुक्ती करणाऱ्या व त्यासाठीच्या लेझर मशीनची निर्मिती करणारे डॉ. शैलेंद्र पाटील, तांदळाचे प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र बाठिया, प्लंबर ते बिल्डर असा प्रवास असणाऱ्या मितेश कन्स्ट्रक्शनच्या नीता गजानन जाधव आणि गीर गायींचे पालक व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक कृष्णा राजाराम अष्टेकर यांचा ‘आऊसाहेब’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, सचिव गिरीश शिंदे, कोषाध्यक्ष संदीप शेळके, कैलास कदम, संभाजी तळेकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. सुरेश गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिशक्ती फाउंडेशन नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते. समाजामध्ये आपल्या कामाने आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या सहा माता- पित्यांना ‘आऊसाहेब’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आता पर्यंत फाउंडेशनतर्फे 96 आदर्श व्यक्तींना गौरविण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी यावेळी प्रास्ताविकादरम्यान दिली.
गावाकडची माणसं शहरात येऊन जेव्हा कर्तृत्व सिद्ध करतात तेव्हा त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. रात्रंदिवस केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचं समाधान लाभते. पुरस्कार प्राप्तींना आता साक्षात राजमाता जिजाऊंचाच पुरस्काराच्या रुपाने आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य यापुढे अधिक जोमाने होईल, असे श्रीनिवास पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. आदिशक्ती फाउंडेशनचे कोषाध्यक्ष संदीप शेळके यांनी आभार मानले.