पुणे. निसर्गातील पारंपरिक जलस्रोत नष्ट होऊ लागले आहे. याच जलस्रोतांना जपण्यासाठी “भवताल” या दिवाळी अंकातून एक चळवळ उभी करण्याचा मानस आहे. जेणे करून या पारंपरिक जलस्रोतांची जपणूक व्हावी. याचा जलस्रोतांचा आढावा घेणाऱ्या भवताल या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे किल्ल्ले सिहंगडावर खासदार छत्रपती संभाजी राजे , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिपक करमळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. अशी माहिती भवतालचे संपादक अभिजीत घोरपडे यांनी दिली. यावेळी देवटाक्यांपासून अमृतेशवर मंदिरापर्यत कलशपूजनही करण्यात आले.
यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक करमळकर , पर्यावरण अभ्यासक अरुणचंद्र पाठक, भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू करमळकर म्हणाले, आज पर्यावरण जागृतीची गरज निर्माण झाली असून भवतालसारख्या अंकातून हे पारंपरिक स्रोत जपण्यासाठी जी चळवळ उभी रहात आहे ती अभिनंदनीय आहे. याशिवाय ती तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.गड, किल्ल्यांची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. या चळवळीत सर्वानी सहभागी होणे गरजेचे आहे.
खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले, आज नैसर्गिक जलस्रोत नष्ट होत असून त्याची जपणूक होणे गरजेचे आहे. तसेच या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने ६०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार त्याचे संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय पर्यावरणाविषयी आस्था असणाऱ्या निसर्ग प्रेमींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.