पुणे – मोदी सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील असल्यामुळे गेल्या पाच
वर्षात या सरकारने महिलाविरोधी धोरणेच राबविली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या
खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित
करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण, उषाताई दराडे, प्रदेश काँग्रेसच्या
सदस्य शानी नौशाद, काँग्रेस नगरसेविका सुजाता शेट्टी आदी उपस्थित होत्या.
२०१४ साली सत्तेवर येण्यापूर्वी मोदी सरकारने महिलांच्याबाबतीत ज्या वल्गना
केल्या होत्या त्यापैकी एकाही चांगल्या धोरणाची अंमलबजावणी मोदी सरकारने केली नाही उलट
युपीए सरकारच्या काळात महिलांच्या बाबतीत ज्या काही चांगल्या योजना होत्या त्या गुंडाळण्यात
आल्या असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’अशी फक्त घोषणा केली
मात्र त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत असे त्या म्हणाल्या. युपीए सरकारने युवतींच्या
कल्याणकारी योजनांसाठी ‘निर्भया फंड’अंतर्गत ३६०० कोटींचा निधी जमा केला होता मात्र मोदी
सरकारच्या काळात त्यातील २१०० कोटी निधी अन्यत्र वळविण्यात आला यावरून महिलांच्या
कल्याणाची मोदी सरकारला किती काळजी आहे याची कल्पना येते. युपीए सरकारने खास
महिलांसाठी भारतीय महिला बँक स्थापन केली होती मात्र मोदी सरकारने ती बँक अन्य बँकेत
विलीन करून टाकली. तसेच मुलींवरील बलात्कार प्रकरणासंबधी चुकीच्या पद्धतीने कायद्याची
अम्म्मलबजावणी केली. महिलांच्या प्रसूतीकाळातील रजा १२ आठवड्यावरून २६ आठवडे केली
खरी मात्र त्यामुळे असंख्य महिलांच्या नोकऱ्यांवर गदा आली ही वस्तुस्थिती आहे असे त्यांनी
सांगितले. मोदी सरकारच्या राजवटीत अंगणसेवीकांच्या मानधनात किरकोळ वाढ करण्यात आली
मात्र त्यांच्या इतर न्याय्य मागण्या अमान्य केल्या त्यामुळे त्याचा अंगणवाडी सेविकांना फार
मोठा फटका बसला. श्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात प्रॉपर्टीमध्ये महिलांना समान हक्क देण्याचा
कायदा केला मात्र तो देशभर व्हावा अशी आमची मागणी मात्र मोदी सरकारने फेटाळून लावली
असे खा. चव्हाण यांनी सांगितले.
मोदी सरकारने पर्यावरणवादी धोरणांना हरताळ फासून अनेक पर्यावरणविरोधी धोरणांची
अम्मलबजावणी केली असा आरोप करून खा. चव्हाण म्हणाल्या, यासाठी मोदी सरकारच्या
काळात अनेक चांगले कायदे बदलण्यात आले. बुलेट ट्रेन होण्यासाठी ७३ हजार झाडे कापण्यात
येणार आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान यांनीही यावेळी मोदी
सरकारवर कडाडून टीका करताना महिलांच्या बाबतीत भाजप नेत्यांनी अतिशय निरर्गल विधाने
केली आहेत त्यावरून महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. तसेच बलात्कारी
प्रकरणातील बाबांना वाचविण्यासाठी भाजपचे मंत्री पुढे येतात यावरून त्यांची 'संस्कृती' दिसून येते
असेहि त्यांनी सांगितले. महिलांच्या कल्याणासाठी काँग्रेस आघाडी सरकारने महाराष्ट्रात डान्स
बारवर बंदी घातली मात्र भाजप सरकारने ही बंदी उठविली असे सांगताना त्या म्हणाल्या हा
अतिशय वेदनादायी गोष्ट आहे.
‘काँग्रेस आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासंबधी
विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, सुप्रिया सुळे या
अतिशय कार्यक्षम प्रतिनिधी आहेत म्हणूनच त्यांना ‘संसद-रत्न’ पुरस्कार मिळाला. त्यांनी ‘ब्ल्यू
फिल्म’वर बंदी आणण्यासाठी संसदेत प्रयत्न केले मात्र पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपचे
उमेदवार यांनी जाहीर सभेत बोलताना, तुम्हीही ‘ब्ल्यू फिल्म’ पहा मीही पाहतो असे सांगून
आपल्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले. महिलांच्याकडे पाहण्याचा काँग्रेस आणि भाजपमध्ये हा फरक
आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.