पुणे -शहरात समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास करण्यात सरकार अपयशी ठरले असून सध्या गावाची परिस्थिती लक्षात घेता. या गावांच्या विकासासाठी पुणे महापालिकेने प्रत्येक गावाला शंभर कोटी रुपये या प्रमाणे अकराशे कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलना दरम्यान केली. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे,महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप बराटे,नगरसेवक प्रकाश कदम,योगेश ससाणे,भैय्या जाधव ,विशाल तांबे,युवराज बेलदरे,रुपाली चाकणकर ,सचिन दोडके,बाळा धनकवडे,अश्विनी भागवत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे,अभय छाजेड यांनी महापालिकेसमोर मोर्चात सहभागी होऊन याप्रकरणी कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादीबरोबर खांद्याला खांदा लाऊन लढा देईल असे आश्वासन दिले.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्य सरकारने पुणे शहरालगतची अकरा गावे महापालिकेत समाविष्ट करून दोन वर्षाचा कालावधी झाला. मात्र अद्यापही त्या ठिकाणी कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत.याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असून या आंदोलनाची दखल सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.