पुणे : खोदकामामध्ये 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे महापारेषणचे 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्र तीन दिवसांपूर्वी बंद पडले असले तरी महावितरणने इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून व तब्बल 75 ते 80 मेगावॉट विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन केले व सुमारे 250 वीजग्राहक वगळता उर्वरित सर्व परिसरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळविले.
खोदकामात तोडलेल्या भूमिगत वाहिनीच्या दोन केबलच्या दुरुस्तीचे काम महापारेषणकडून युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी चेन्नईवरून तज्ञ कर्मचाऱ्यांसह खास टीम पुण्यात दाखल झाली आहे व चेन्नईवरून आणलेले जॉईंट या नादुरुस्त वाहिनीला चार ठिकाणी लावण्याचे काम सुरु आहे. हे काम बुधवारी (दि. 6) रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर या वाहिनीद्वारे 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात येईल.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात पुणे महानगरपालिकेकडून सुरु असलेल्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 11.33 वाजता बंद पडला आहे. त्यामुळे महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाल्याने पर्वती, बंडगार्डन, शिवाजीनगर, पद्मावती व रास्तापेठ विभागातील सुमारे 2 लाख वीजग्राहकांना फटका बसला होता. यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्तीमधील सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
परंतु दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्यासह सुमारे 60 ते 70 अभियंते व कर्मचाऱ्यांनी बाधीत झालेल्या भागांत इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यास प्राथमिकता दिली. यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 99 टक्के भागात तर रास्तापेठ विभागातील नाना पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, दारुवाला पुल, रविवार पेठ, गणेश पेठ आदी परिसरात रात्री 12 वाजता पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. यासाठी थेट मुंढवा व फुरसुंगी 132 केव्ही उपकेंद्राद्वारे सेंट मेरी, रास्तापेठ, लूल्लानगर आदी उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापि पद्मावती विभागात सोमवारी (दि. 4) भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे सेवन लव चौकातील तीन रोहित्रांवरील सुमारे 250 ग्राहकांचा तसेच पद्मावती व पर्वती विभागातील तीन उच्चदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने दोन ते अडीच तासांसाठी बंद ठेवावा लागला.
भारनियमनाची शक्यता असलेल्या सर्व पेठांसह इतर परिसरातील वीजग्राहकांना वीजवापर कमीत कमी व नियंत्रित करण्याची विनंती ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून करण्यात आली होती. वीजग्राहकांच्या सहकार्याने तसेच सध्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असताना सुद्धा महावितरणने सुमारे 75 ते 80 मेगावॉटचे यशस्वी भारव्यवस्थापन करून भारनियमन टाळण्यात यश मिळविले. महापारेषणकडून बुधवारी (दि. 6) रात्री उशिरापर्यंत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महावितरणकडून शहराच्या बाधीत मध्यवर्ती व इतर परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येत आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी कमीत कमी विजेचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.