पुणे : विद्युत अपघात टाळण्यासाठी विजेची घरगुती उपकरणे किंवा सार्वजनिक वीजयंत्रणांपासून सतर्क व सावध राहण्याचा संदेश देण्यासाठी रविवारी (दि. 13) प्रभात फेरी काढून विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात आला.
राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित जिल्ह्यातील विद्युत सुरक्षा सप्ताहाला सुरवात झाली आहे. यानिमित्ताने महावितरणच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, विद्युत निरीक्षण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सु. रा. नलावडे, विद्युत निरीक्षक श्री. चं. तु. थोरात, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोशिएशनचे (इकॅम) अध्यक्ष श्री. सुनील गायकवाड, उपाध्यक्ष श्री. मारूती माळी, सचिव श्री. अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्युत अपघातातील जीवहानीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते व कर्मचारी गमावल्याने कंपनीचे तसेच कुटुंबियाचे भरून न येणारे नुकसान होते. विद्युत यंत्रणेपासून सावधानता न बाळगल्याने नागरिकांनाही अनेक कारणांमुळे वीज अपघात होतात. त्यामुळे वीज कर्मचारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी विद्युत यंत्रणेपासून सतर्क राहण्याची काळजी घेतली पाहिजे. विद्युत यंत्रणेत काम करताना जाणते, अजाणतेने झालेली चूक ही जिवावर बेतू शकते. त्यामुळे विद्युत यंत्रणेतील अपघाताचे धोके टाळण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्कता किंवा सावधगिरी बाळगणे यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले.
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर महावितरण, विद्युत निरीक्षक विभाग, इकॅम व औद्योगिक कंपन्या यांच्या संयुक्तपणे सकाळी 9 वाजता विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली. रास्तापेठ, संत कबीर चौक, लक्ष्मी रोड, घोडेपीर व अपोलो टॉकीज या परिसरात जनजागृती करीत निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी माहिती पत्रक, माहिती पुस्तिकांचे नागरिकांना वितरण करण्यात आले. या रॅलीत सहाय्यक विद्युत निरीक्षक श. ह. सुतार, श्री. ल. डेकाटे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सर्वश्री अंकुर कावळे, दीपक लहामगे, शिवाजी वायफळकर, दिलीप भोळे, मधुकर घुमे, राहुल गवारे, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र म्हंकाळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, इकॅमचे राजेंद्र सिन्नरकर, अशोर पांढरे आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कंपन्या, महाविद्यालयीन विद्यार्थी व सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते.