पुणे-महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलीच्या शाळेविषयी भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी आणि निषेध व्यक्त करणारे निवेदन फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांना मशाल मोर्चाच्या वतीने देण्यात आले .
बुधवार पेठ येथे भिडे वाडा गेल्या अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे . त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे . या भिडे वाड्याचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी महाराष्ट्रातील तमाम फुले अनुयायी अनेक वर्षांपासून करीत आहेत . ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडचणींचा सामना करून व विरोध पत्करून देशात मुलींसाठी याच भिडे वाड्यामध्ये शिक्षणाची दारे खुली करून दिली . भिडे वाड्याची अवस्था दयनीय झाली आहे . या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे हि मागणी शासनाकडे वेळोवेळी करून शासन दुर्लक्ष करीत आहे .
येत्या १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०१८ नायगाव ते भिडेवाडा पर्यंत जनजागरण मशाल मोर्चाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो . लवकरात लवकर या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक म्हणून पुरुज्जीवन करावे व शासनास चेतावणी देणार आहोत .
निवेदन देते वेळी भिडे वाडा बचाव मोहिमेच्या समन्वयक सपना माळी , युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत , सचिव वृषाली शिंदे ,जनता दलाचे अध्यक्ष विठ्ठल सातव , संवेदना फाऊंडेशनच्या गणेश माळी , ओ बी सी सेवा संघाचे राजेंद्र नेवसे , ओ बी सी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड , ड्रॅगॉन मार्शल आर्टसचे मोती मुदलियार , राजस्थानी माली समाजाचे नरेश सोलंकी , ओ बी सी चे महासभेचे पुणे शहर अध्यक्ष सचिन कचरे , आशिष पालकर व सुरेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .