पुणे-“ पारंपारिक शिक्षणाबरोबरच मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. जाती धर्माच्या भिंती ओलांडून मानवापर्यंत संस्कार देण्याची ही परिक्षा पद्धती आहे. त्यामुळे संस्कारक्षम नागरिक तयार करण्यास मदत होईल.”असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी,पुणेच्यावतीने आयोजित केल्या गेलेल्या “वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०१९” या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी परीक्षेचे प्रमुख समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि प्र-कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस हे उपस्थित होते.
डॉ.सबनीस म्हणाले,“ या परिक्षेमध्ये विश्वात्मक संस्कृती, शिक्षण, विज्ञान, अध्यात्म, नितिमूल्य, विश्वशांती तसेच संत महात्मांची ओळख अशा अनेक विषयांचा अंतर्भाव आहे. त्यामुळे या परीक्षेतून सर्वगुण संपन्न नागरीक तयार होतो. हेच विद्यार्थी समाजात बदल घडविण्यासाठी अग्रस्थानी असतील.”
“या परिक्षेच्या माध्यमातून ते केवळ विद्यार्थी घडवित नाही तर समाजाचे चरित्र निर्माण करीत आहेत. सर्वधर्मांचे ग्रंथ हे जीवनग्रंथ असून भारतीय संस्कृतीची मुळे ही खोलवर रूजलेली आहे. त्यामुळे नव्या पिढीला याची जाणीव करणार्यासाठी डॉ. कराड यांनी वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण परिक्षा सुरू केली. मुळात अशी संकल्पना राबविणे म्हणजेच विश्वशांतीसाठी उचलेले पाऊल आहे. शिकागो येथे स्वामी विवेकांनद हेे अध्यात्म आणि विज्ञानावर बोलले पण डॉ. कराड यांनी हीच मूल्यवर्धित शिक्षण पद्धती चालविली. ज्यातून सृष्टीवरील ७०० कोटी लोकांसाठी ते शांतीचा मार्ग शोधित आहेत.
डॉ. प्रमोद येवले, “ ही परिक्षा देऊन कोणालाही नोकरी मिळणार नाही परंतू संस्कृतीची जोपासना केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हे शिक्षण सर्वांना मिळावयाला हवे. ज्या प्रकारे विदेशात भारतीय संस्कृतीचे जतन केले जात आहे, तसेच आपल्या येथे करण्याची वेळ आली आहे. सध्या या देशाला शाश्वत शिक्षणाची गरज असून ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगिण विकास करावयाचा आहे.”
“१३० कोटीच्या देशामध्ये चांगला माणूस मिळू नये ही देशाची शोकांतिका आहे. याला आपली शिक्षण पद्धतीच जवाबदार आहे. त्यासाठी ही परिक्षा एक प्रभावी माध्यम असून यातून चांगला माणूस निर्माण होईल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ पारतंत्र्यामुळे भारत देशाने अस्मिता गमाविली आहे. ब्रिटीश लोकांनी भारतीय संस्कृतीवर आघात केला. येथे शेकडो वर्षांपूर्वींच संतांनी आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याच मार्गावर चालून संपूर्ण जगाला विश्व शांतीचा संदेश देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती येथे केली आहे. येणार्या काळात वसुधैव कुटुम्बकमच्या मंत्रातूनच सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखवू.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“परिक्षेमुळे भौतिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास होतो. मन आणि शरीराचा विकास म्हणजेच शिक्षण आहे. मुलांना संस्कार देण्यासाठी सुरू केलेली ही परिक्षा आज राज्यातील सर्वं शाळांमधील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच पुढील वर्षी ही परिक्षा गोवा राज्यात घेण्याचा मानस आहे”.
या वेळी कु.श्रृती पवार, कु.रिया गोरे, कु. स्नेहा ओंबासे व अन्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निलिमा शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवयानी पालवे यांनी आभार मानले.