पुणे- वर्तमान काळात आरोग्याचा प्रश्न सर्वांशी निगडीत असतो. परंतू वेगवेगळया कारणांनी या क्षेत्रात बर्याच अडचणी निर्माण होऊन दिवसेदिवस त्या वाढतच आहेत. अशावेळेस वैद्यकीय क्षेत्राची सामजिक निकड भागविण्यास पोलिस, डॉक्टर्स व नागरिकांचा सहयोग अत्यंत महत्वाचा आहे. असा सूर ‘सहकारी संबधाच्या दिशेने काम करणारे पोलिस, डॉक्टर्स आणि समाज’ या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात निघाला.
लोणी काळभोर येथील विश्वराज सूपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित या चर्चासत्रात बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. एस.डी.नणंदकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, पोलिस अधिकारी सई भोर पाटील, बीजे. मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रा. डॉ. नरेश झांजड, वैद्यकीय सल्लागार डॉ. राजेंद्र बंगाळ आणि भाजपाच्या नेत्या कांचन कुल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. राम, डॉ. दोषी व डॉ. रूपा हे उपस्थित होते.
या चर्चासत्रामध्ये डॉ. नरेश झांजड म्हणाले, दुघर्टना झालेल्या रूग्णांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती करतात तेव्हा पोलिसांना या संदर्भात सूचित करणे गरजेचे असते. त्यानंतर डॉक्टरांनी रूग्णाचा पुढील उपचार करावा. बर्याच घटनेत रूग्ण जेव्हा दगावतो तेव्हा एमएलसी करणे, ब्राँडडेड केसमध्ये मृत्यूचे नेमके कारण काय असते त्यासाठी सुद्धा पोलिसांना सूचित करावे. वैद्यकीय क्षेत्रातील कायदा गुंतागुतीचा असतो ही धारणा चुकीची आहे. या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ही रूग्णाशी जुळलेली असल्याने त्याचे नातेवाईक हे भावनिक होतात व त्यांच्याकडून चुकीचे पाऊले उचलले जाते. अशावेळेस डॉक्टर्स व पोलिसांनी समजूतदारपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे.
विवेक पाटील म्हणाले, एखाद्या आरोपीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करतात. त्यावेळेस त्याच्या सुरक्षेची जवाबदारी ही पोलिसांचीच असते. अशावेळेस डॉक्टरांनी भूमिका ही फक्त त्यावर उपचार करणे आहे.
बर्याचवेळी उपचार, ऑपरेशन्स, मेडिकल बील, औषधे अशा वेगवेगळ्या कारणांनी रूग्ण, रूग्णांचे नातेवाईक व डॉक्टर्स यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विवाद होतात. हा विषय भावनिक असल्याने पोलिस सुद्धा हा प्रश्न मिटविण्यास असमर्थ असतात. या प्रसंगी स्थानिक समाजिक कार्यकर्ता ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. तो डॉक्टर्स व रूग्णांचे नातेवाईक यांच्यातील मतभेद मिटविण्यास मदत करतो. त्यामुळेच डॉक्टर, पोलिस व सामाजिक कार्यकर्ता यांच्यात योग्य समन्वय असल्यास बरेच प्रश्न सुटू शकतात.
डॉ. अदिती राहुल कराड म्हणाल्या, डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले हे विचारणीय बाब आहे. त्याच घटनेला अनुसरूण आजचे शिबिर म्हत्वाचे आहे. आज २००० पेशंटच्या मागे एका डॉक्टराची गरज असते. परंतू ही गरज अद्याप पूर्ण झालेली नाही. डॉक्टर हा एका अर्थाने सामाजिक कार्यकर्ताच असतो. तो जेव्हा समाजसेवेचे व्रत धारण करतो तेव्हा त्याला पोलिसांचा सहयोग असेल तर ते चांगल्या प्रकारे कार्य करेल.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात विश्वहार्यता वाढविण्यासाठी डॉक्टर, पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून कार्य करावे. वर्तमान काळातील सर्वात मोठा प्रश्न आरोग्याचा असतो. ही सेवा योग्य दरात व चांगली मिळाली तर सर्वांचे भले होईल. यासाठी पोलिसांचा सहयोग अत्यंत महत्वपूर्ण आहे. पुणे हे युवकांचे शहर असल्यामुळे पोलिसांनी समाज जागृतीचे कार्य करावे.विश्वराज हॉस्पिटल हे सर्वांच्या सेवेसाठी आहे. ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या चहूबाजूला पोहचविण्याच्या दिशेने सर्व डॉक्टरांनी मिळून कार्य करावे.
डॉ. टी. पठाण यांनी प्रास्ताविक केली. डॉ.पी.के.देशमुख यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
वैद्यकीय क्षेत्राची सामाजिक निकड भागविण्यास पोलिस, डॉक्टर्स व नागरिकांचा सहयोग आवश्यक
विश्वराज हॉस्पिटलतर्फे एक दिवसीय चर्चासत्र संपन्न