संगीतामुळे मनाचा एक आयाम जागृत होतो – गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांचे प्रतिपादन
पुणे:“समग्र विश्व कसे चालते, याचा वेध घेण्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यात संगीत कला ही एक सर्वात महत्वपूर्ण साधना आहे. भावना, बुध्दी, तर्क आणि भक्तीने याची अनुभूती घेता येऊ शकते. संगीतामुळेच मनाचा एक वेगळाच आयाम जागृत होतो,”असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक प्रसिद्ध गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, प्रा. सुनिता मंगेश कराड व एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनिवास भीमसेन जोशी म्हणाले,“ संगीत हे जसे ईश्वर प्राप्तीचे एक साधन मानले जाते, तसेच, निखळ आनंद आणि चिंतामुक्त व्हावयाचासुध्दा तो एक उत्तम मार्ग आहे. येथे ज्ञानाची प्राप्ती करावयाची असते. असा संगीतमय कार्यक्रम हा निसर्ग रम्य ठिकाणी झाल्याने आपल्याला ईश्वर प्राप्तीची अनुभूति येते. अशा भव्य दिव्य परिसरात सदैव संगीत आणि ज्ञानसाधनेचे कार्य अविरत चालत रहावे.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“संगीताच्या माध्यमातून शांतीकडे कसे पोहचता येईल ही विचारधारा घेऊन डॉ. विश्वनाथ कराड यांनी हा महोत्सव सुरू केला. संपूर्ण विश्वात नववर्षाचा जल्लोष केला जातो. परंतू येथे भारतीय परंपरेला धरून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारत देशात सर्व प्रकारच्या विचारधारा आहेत. त्यामुळे येथे पाश्चात्य आणि पौर्वात्य यांचा मिलाफ दिसून येतो. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयातून जगात सुख, शांती आणि समाधान प्राप्त करता येऊ शकते. या वर्षी भीमसेन जोशी आणि मंगेशकर घराण्याचा येथे मिलाफ दिसून येतो.”
प्रा.ज्योती कराड-ढाकणे म्हणाल्या, “सरत्या वर्षात प्रत्येकाला काही चांगल्या व वाईट गोष्टींचा अनुभव आला असेल. त्यामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहाने करतांना येथील होम हवनात आपल्यातील वाईट गोष्टींची आहूती देऊन नवीन संकल्प सोडवा. या संगीत महोत्सावाच्या सुरूवातीच्या काळात येथील मेघडंबरीमध्ये देशातील सर्व प्रसिद्ध गायकांनी उपस्थिति दर्शवून आपली कला सादर केली. त्यावेळेस श्रोते नदीच्या काठावर बसून त्याचा आस्वाद घ्यायचेे. अशी संकल्पना डॉ. विश्वनाथ कराड यांनी सुरू केली. हा कार्यक्रम देशातील अग्रणी आहे. त्याप्रमाणे येथे संगीत अकादमी चालत असल्यामुळे पुण्यातील दर्दी श्रोत्यांनी याचा आस्वाद घ्यावा.”
डॉ. सुनील राय म्हणाले,“ भारतात संगीताची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेला जागविण्याचे काम सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाद्वारे केले जात आहे. नववर्षाचे स्वागत पाश्चात देशांमध्ये विशिष्ठ पद्धतीने साजरे केले जाते. मात्र एमआयटी सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक परंपरा रूजविण्यासाठी नववर्षाचे स्वागत केले जाते. भविष्यात युरोप आणि अमेरिकेत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करून नव वर्षाचे स्वागत करतील.”
आदिनाथ मंगेशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केेले. प्रा. अशोक घुगे व प्रा. पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने झाली. श्रृती देवस्थळी, तेजस उपाध्ये व गोदावरीताई मुंडे यांनी आपली कला सादर केली.