‘घुमट’ हे भारतीय सांस्कृतीक राष्ट्राचे मंदिर -बिहारचे पर्यटन मंत्री प्रमोद कुमार यांचे मत
-श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
पुणे-“ भारतमातेच्या सांस्कृतिक राष्ट्राचे मंदिर राजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेले ‘घुमट’ आहे. आम्ही उद्या असू अथवा नसू पण विश्व शांतीसाठी संपूर्ण जगाचे नेतृत्व या घुमटातूनच होईल.”असे मत बिहारचे पर्यटन मंत्री प्रमोद कुमार यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्व शांती विद्यापीठ, पुणे व विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्यातर्फे ‘विश्वराजबाग’, लोणी काळभोर, पुणे येथे साकार होत असलेल्या, जगातील सर्वात मोठ्या व एकमेवद्वितीय अशा घुमटाकार वास्तुमध्ये – तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रमोद कुमार व महर्षी वेद व्यास यांच्या पुतळ्यांचे अनावरण ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी डॉ. सत्यव्रत शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, बीजेपी महाराष्ट्रचे अतुल कुमार, बोथरा शेठ, इस्तीयाक अहमद, श्री.काशीराम दा. कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, श्रीनिवास आचार्य व के.के.झा हे उपस्थित होते.
प्रमोद कुमार म्हणाले,“ संस्कृती, त्याग आणि तपश्चर्या यांच्या एकत्रिकरणामुळे भारत ही माता आहे. जगात कोणत्याही देशाला माता म्हणून संबोधले जात नाही. परंतू, भारताला मात्र मातेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचे कारण म्हणजे आपली भारतीय संस्कृती होय. ताज महल व लाल किल्ला बनविणारे या सृष्टीवरून निघून गेलेत परंतू ते पाहण्यासाठी आज लाखों नागरिक येतात. तसेच डॉ. विश्वनाथ कराड यांनी उभारलेल्या विश्व शांतीची वास्तू अनुभवण्यासाठी भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील. येथे बसविण्यात आलेले पुतळे हे जागतिक संस्कृती, त्याग व तपश्चर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे त्यांची कीर्ती जगभरात पोहचेल.”
“भारत एक सांस्कृतीक राष्ट्र आहे. आज गांधीजीच्या पुतळ्याचे अनावरण करतांना मोठा अभिमान वाटतो. मी ज्या ठिकाणून म्हणजेच चंपारण्यातून आलो आहे, तेथूनच त्यांनी इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविला होता. सत्य व अहिंसाच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसेच, महाराष्ट्राच्या भूमीतील अनेक महान विभूतींनी सार्या जगाला शांतीचा संदेश दिला आहे.”
डॉ. सत्यव्रत शास्त्री म्हणाले,“ सार्या जगाला वैदिक ज्ञान देण्यासाठी या पुतळ्यांची निर्मिती केल्या गेली आहे. येथे बसविण्यात आलेल्या सर्व पुतळ्यांनी त्यांच्या काळात मानवकल्याण व त्यांच्या उध्दारासाठी कार्य केले आहे. संत, अध्यात्म आणि विज्ञान क्षेत्रात ज्यांच्या अतुलनिय कार्याद्वारे मानवजातीचे कल्याण झाले आहे अशा महामानवांच्या पुतळ्यांना पाहूण आम्हाला स्फूर्ती मिळेल. या घुमटातून विश्व शांतीचा संदेश दिला जाईल परंतू ही शांती फक्त मानवाला नाही तर संपूर्ण प्राणीमात्रांसाठी हवी आहे.”
“महर्षी वेद व्यास हे जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ होता. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञानाचे दालन उघडले. महाभारत व पुराणाच्या माध्यमातून मानवतेचे दर्शन व्यासांनी घडविले आहे. आज सृष्टी ज्या काही घडामोडी घडतात ते सर्व शांतीसाठीच त्यामुळे या वास्तू अन्ययसाधारण महत्व आहे.”
प्रा. डॉ.विश्वनाथ दा कराड म्हणाले,“ या घुमटाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मानवता, त्याग, समर्पण आणि सर्व धर्म समभावचा एक अनोखा मिलाप या वास्तूमध्ये घडविण्यात आला आहे. भारतात ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाता आहे. हे अंतीम सत्य म्हणजे शांती होय.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. सुनील राय यांनी अभार मानले.