पुणे -मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांना दशरथांनी तसेच पुरुषोत्तम भगवान् श्रीकृष्णांना त्यांच्या जनकांनी गायत्री दिक्षेनंतरच गुरूंच्या जवळ नेऊन उपनयनानें गुरुकुलवासी केल्यानंतरच ते शस्त्र-शास्त्रदीक्षित झाले. श्रीराम, श्रीकृष्ण हे दोघेहि जन्मानें ब्राह्मण नव्हेत. गायत्री मंत्राचा द्रष्टा विश्वामित्र-महर्षि हेहि जन्माने ब्राह्मण नव्हते. परंंतु ही सर्व जन्मानें ब्राह्मणेतर मंडळी गायत्री उपासनेनेंच विश्ववन्द्य ठरली. यामुळे गायत्री दीक्षा ही सर्वांसाठीच उज्ज्वल चारित्र्य आणि बौध्दिक तेजस्वितेसाठी केवळ इष्ट नव्हे अत्यावश्यक आहे.
म्हणूनच डॉ. विजय भाटकर आणि एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वाद-मार्गदर्शनाने श्री. राहुल कराड यांचा सुपुत्र चि. आर्यव्रत कराड याचा गायत्रीदीक्षा उपनयन विधि त्यांच्याच निवासस्थानी मी पार पाडला. याप्रसंगी छत्रपति शिवराय या आमच्या राष्ट्रदेवताचा गायत्री संस्कार १६७४ मध्ये गागाभट्टांनी पार पाडला होता. याचे मला प्रेरक संस्मरण झाले. श्री. राहुल कराड यांचेप्रमाणेच आमच्या सर्व समाजबांधवांनी आपापल्या बटूंनां “गायत्रीदीक्षेनें तेजस्वी, यशस्वी, वर्चस्वी करावे” असे आवाहन पं. वसन्तराव गाडगीळ यांनी सर्व समाजाला केले आहे.