संभाजी भिडेंना वाचवण्यासाठीच कबीर कला मंच कार्यकर्त्यांच्या घरावर छापे
एल्गार परिषदेचे मुख्य संयोजक आकाश साबळे यांचा आरोप
पुणे– एल्गार परिषदेशी संबंधित कबीर कला मंच कार्यकर्त्यावर पोलिसांनी टाकलेले छापे हे दहशत पसरवण्यासाठी टाकण्यात आले असून ही मुस्कटदाबी आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणातील संभाजी भिडे यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच सरकार कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकत असल्याचा आरोप एल्गार परिषदेचे मुख्य संयोजक आकाश साबळे यांनी केला.
पुणे पोलिसांनी आज (17 एप्रिल) भल्या पहाटे एल्गार परिषदेशी संबंधित कबीर कला मंचच्या पुण्यातील कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकले. त्याचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभेचे प्राचार्य म ना कांबळे, दलित आदिवाशी संघटनेचे अॅड.केशव वाघमारे, भिमशाही युवा संघाचे नितीन गायकवाड, अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाचे किशोर कांबळे, स्वराज अभियानाचे इब्राहिम खान आदी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, पोलिसांनी कबीर कलामंचचे कार्यकर्ते रमेश गायचोर, सागर गोरखे यांच्या घरावर भल्या पहाटे छापे टाकले. त्यांचे मोबाईल हिसकावून घेत त्यांना मदतीसाठी संपर्कही करू न देता त्यांच्या घराची झडती घेतली. अशाप्रकारची दहशतपुर्ण कारवाई करून पोलिसांना काय संदेश द्यायचा आह. कोरेगाव-भिमा प्रकरणातील संभाजी भिडे यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एल्गार परिषदेला नक्षलवादाचे लेबल लावले जात असल्याचा आरोप त्यांनी केली.
म ना कांबळे म्हणाले, डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचे, पानसरेंच्या खुन्यांचे सनातनी संघटना आणि हिंदू अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. परंतू त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी आजवर छापे टाकले नाहीत. यातून सरकार उघडपणे भेदभाव करत असल्याचे दिसत असल्याचे सांगून सरकार हुकूमशाहीने वागत असल्याचे ते म्हणाले.