पुणे : “भारतमाता हाच माझा धर्म असून, वंदे मातरम ही माझी जात आहे. मानवतेच्या भावनेतून आपण एकमेकांकडे पहिले पाहिजे. मात्र, आज देशात धर्म, जात, पक्ष या माध्यमातून वेगवेगळे गट पडले आहेत. दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशावेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे,” असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे (एआयएटीएफ) चेअरमन मनिंदरजीत सिंग बिट्टा यांनी केले.
पुण्यातील पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रिडामंच येथे आयोजित ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात बिट्टा बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’, तर आमदार महेश लांडगे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी एआयएटीएफ मुंबईचे अध्यक्ष पी. एस. अहुजा, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार राहूल कुल, विचारवंत दत्ता कोहिनकर, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, उद्योजक संतोष धनकवडे, ऋषी बालगुडे, ऍड. मंदार जोशी, विकास कांबळे, अनिल बोडके, निखिल निगडे आदी उपस्थित होते. शिंदे यांच्या वतीने त्यांचे मित्र बळवंत सासवे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये वीरमाता ताराबाई साष्टे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, चोरडिया शिक्षण संस्थेचे डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, धीरज घाटे, उद्योजक अमित गायकवाड, डॉ. वैशाली जाधव यांचा समावेश होता.
मनिंदरजित सिंग बिट्टा म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जवान अहोरात्र पहारा देतात. त्यांच्यावर पाकिस्तानसारख्या राष्ट्रांकडून गोळीबार केला जातो. अशावेळी नवज्योत सिंग सिद्धूसारख्या जबाबदार व्यक्तीने केवळ आपल्या फायद्यासाठी शत्रूराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानात जावून भेटणे चुकीचे आहे. जेएनयू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीत समाज विघातक कारवाया करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.”
महेश लांडगे म्हणाले, “राजकारणात येण्यापूर्वीपासून नागरिकांची सेवा करत आलो. यामुळेच नगरसेवक ते आमदारपदापर्यंत पोहचलो. संघर्ष करणाऱ्याला कुठलेही ध्येय गाठणे अशक्य नसते. गरजूंना मदत करणे हेच मोठे काम असून, यापुढेही पद असो वा नसो ते सुरु राहील.संघर्षाशिवाय जीवनाला अर्थ नसतो. संघर्षातून आलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते, हे नितीन काळजे आणि राहुल जाधव या पिंपरीच्या दोन्ही महापौरांमध्ये पाहिले आहे.”
राहुल कुल म्हणाले, “पर्यावरण, पाणी, शेती, रोजगार यासंबंधित अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. हे सोडवण्यासाठी धोरणात्मक काम करणारी माणसे चांगली हवीत. त्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत चांगले लोक निवडून देणे युवकांच्या हाती आहे.”
उदय जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शशिकांत कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे आणि मोनिका जोशी यांनी केले. तत्पूर्वी, अभिजित व प्रसेनजीत या कोसंबी बंधूंच्या देशभक्तीपर आणि सिनेगीतांनी कार्यक्रमात रंगात आणली.