जगावर आजही गांधीं नावाचे गारुड : डॉ. आबनावे
महाराष्ट्र हरिजन सेवक संघातर्फे गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला व्याख्यान
पुणे : ”अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेली भारतीय वंशाची महिला कमला हॅरिस मुलाखतीत महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग माझे आदर्श असल्याचा उल्लेख करते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत हा देश बुद्धांचा आणि गांधींचा असल्याचे सांगतात. जगातील सर्वच देश भारताकडे गांधींचा देश म्हणून बघतो. गांधीजींच्या विचारांत प्रचंड ताकद आहे. आजही जगावर गांधीं नावाचे गारुड आहे,” असे मत महाराष्ट्र हरीजन सेवक संघाचे सहसचिव व महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र हरीजन सेवक संघातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालयात आयोजित व्याख्यानात डॉ. आबनावे ‘अज्ञात गांधी’ या विषयावर बोलत होते. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सदस्य प्रज्योत आबनावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रसाद आबनावे, विभागप्रमुख रेखा दराडे, कल्याणी साळुंखे, अशोक विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कांबळे, इंद्राणी रानडे आदी उपस्थित होते. यावेळी कलाशिक्षक भागुजी शिखरे यांनी काढलेले गांधींजींचे चित्र भेट देऊन डॉ. आबनावे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, ”गांधींनी देशभ्रमंती करताना दारिद्र्य पाहिले. त्याच्या संवेदनशील मनाने सुटाबुटातील कपड्यांचा त्याग करत पंचा आणि धोतर परिधान केले. गांधीजी जिथे गेले तिथे त्यांचे अनुयायी निर्माण झाले. रेडिओ, टीव्ही यासारखी माध्यमे नसताना ते देशातील ४५ कोटी लोकांपर्यंत पोहचले. चरख्यावर सुत कातून कामातून भारतातील महिलांना स्वतंत्रलढ्यात सहभागी करून घेतले. आज १४० देशात गांधीजींचे पुतळे आहेत. त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळण्यात येते. सत्याग्रहाचा मार्ग ही कस्तुरबांची देण होती. डॉ. आंबेडकरांसोबत पराकोटीचे मतभेत झालेले असूनही, त्याना मंत्रिमंडळात घ्यावे हा गांधीजींचा आग्रह होता. गांधीजींनी अंहिसा, सत्याच्या आधारे जगावर राज्य केले. वेगवेगळ्या माध्यमानी गांधींजीची मोठ्या प्रमाणावर बदनामी केली. पण गांधी आणि गांधीजींचे विचार कधीही संपले नाहीत आणि संपणारही नाहीत. विचारांतून ते कायम आपल्यासोबत आहेत, याची प्रचिती येते.”
प्रज्योत आबनावे यांनीही अध्यक्षयीय भाषणात गांधींजींविषयीच्या भावना व्यक्त केल्या. प्रा.गौरी पास्ते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्योती हिरे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना अनारसे यांनी आभार मानले.