ब्राह्मणांनी यापूर्वीही देशाचं नेतृत्व केलंय, पुढेही करतील; भाजपा आमदार मेधा कुलकर्णीं
पुणे : “समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. पण ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे लक्षात येत नाही, की यापुर्वीही देशाचे नेतृत्व ब्राम्हण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल. काहीवेळा अनुनयत्व पत्करले व देशाच्या एकात्मतेला तडा जाऊ दिला नाही. संत ज्ञानेश्वरांनी दुसऱ्यासाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी आपलं आयुष्य झिजवले. याचा अर्थ असा, की ब्राहमण समाज पूर्वीपासून दुसऱ्यांसाठी करत आला आहे.”असे स्पष्ट वक्तव्य आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी येथे केलं
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या मोहिनीताई पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘मातृशक्तीचा जागर’ मेळाव्यात उद्योजिका जयंती कठाळे, मोहिनीताई मोडक, आरजे शोनाली रानडे, सविता वासेकर, मंजुश्री कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
“स्त्री-पुरुषांनी एकमेकांना समजून काम केले पाहिजे. आज महिलांसाठी कोणतेही क्षेत्र निषिद्ध नाही. अभिनयासह कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा; पण त्यासोबतच मूल्ये आणि तत्वे सोडू नका. महिलांनी ‘सुपरवुमन’ बनण्याच्या मागे लागू नये,” असे प्रतिपादन यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शोभाताई फडणवीस म्हणाल्या, “महिलांमध्ये अफाट शक्ती असते. तिचा वापर आपण केला पाहिजे. समाज घडविणे आपल्या हातात असून, देशासाठी चांगली पिढी निर्माण करण्याचे काम महिला करू शकतात. निर्भीड, क्रांतिकारी, विचारी आणि सदृढ समाज निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. सध्या शहरी नक्षलवाद, दहशतवाद हे प्रश्न सतावत आहेत. त्याला हद्दपार करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र आले पाहिजे.”
मनीषा कायंदे म्हणाल्या, “ब्राह्मण समाजातील महिला कल्पक, बुद्धिमान आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार अनुरूप पावले टाकली पाहिजेत. ग्रामीण भागात फिरताना अनेकदा ब्राह्मण समाज उपेक्षित असल्याचे दिसते. त्यासाठी आपण एकमेकांना सहकार्य करीत समाजाला पुढे घेऊन जाण्याचा आपला उद्देश असावा. ‘मी टू’ चळवळीमुळे महिला बोलू लागल्यात. कोणत्याही समाजाची महिला असली, तरी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.”
मुक्ता टिळक म्हणाल्या, “राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण असले, तरी अजूनही महिलांचे प्रमाण कमी आहे. सुशिक्षित महिला राजकारणात आल्या, तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वच्छ वातावरण निर्माण होईल. शिक्षणाची ओढ महिलांमध्ये आहे. त्यांना शिकू दिले पाहिजे.”