सकारात्मक दृष्टी, आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली- हणमंतराव गायकवाड यांचा कानमंत्र
; स्पर्धा परीक्षा महोत्सवात व्यवसाय संधींवर मार्गदर्शन
पुणे : “कोणत्याही व्यवसायात काम करण्यासाठी भरपूर संधी आहेत. उपलब्ध संधींचा शोध घेऊन त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारात्मक दृष्टी, कठोर परिश्रम, चांगली संगत आणि आत्मविश्वास असायला हवा. तुमच्याकडे आत्मविश्वास आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल, तर यश हमखास मिळते. सकारात्मक दृष्टी आणि स्वतःवरील विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असा कानमंत्र बीव्हीजी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी दिला.
सृजन फाऊंडेशन आणि एमपीएससी स्टुडंट्स राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘स्पर्धा परीक्षा महोत्सवाच्या चौथ्या सत्रात ‘बेरोजगारी व व्यवसायातील संधी’वर ते बोलत होते. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ‘रूरल रिलेशन’चे संचालक प्रदीप लोखंडे, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक, बारामती ऍग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते.
बीव्हीजी ग्रुपची निर्मिती, विस्तार याविषयी बोलताना हणमंतराव गायकवाड म्हणाले, “२००१ मध्ये चांगली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. अनेक अडथळे आले, पण ध्येयापासून विचलित न होता काम सुरु ठेवले. सुरुवातीला आठ सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु केलेला व्यवसाय आज ८० हजार सहकाऱ्यांचा झाला आहे. सामाजिक काम करताना सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन कसे करता येईल याचा प्रामुख्याने विचार केला आणि तो प्रत्यक्षात आणला. त्यामुळेच यशस्वी झालो.” सकारात्मक दृष्टी, निरीक्षण शक्ती, स्वतःसाठी काम करण्याची मानसिकता ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला.
माहिती तंत्रज्ञानातील संधी यावर बोलताना विवेक सावंत म्हणाले, “स्वतःला व इतराना समजावून घेत जगाशी संवाद करणे, ही २१ व्या शतकाची गरज आहे. ती ओळखली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत, असा विचार प्रवाह आहे. त्यावर चर्चाही होते. पण त्याचबरोबर सेवा क्षेत्राची गरज वाढू लागली आहे. ‘लर्निग अँड अर्निंग’ हा आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग आहे. इ-कॉमर्स महत्वाचा घटक बनला आहे. त्याचा विचार करून पावले टाकली पाहिजेत. कारण या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. लागणारी कौशल्य आत्मसात केली, तर हे क्षेत्र संधींचे भांडार आहे.”
‘ग्रामीण भागातील व्यवसाय संधी’वर बोलताना प्रदीप लोखंडे म्हणाले, “ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तेथेही सर्व सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. रोजगाराच्या बरोबरीने स्वतंत्र व्यवसायाच्या संधी असून, त्यावर आपल्याला काम करता आले पाहिजे. विविध उत्पादनांच्या कंपन्या ग्रामीण भागात जात नाहीत. दुकानाच्या माध्यमातून उत्पादने जनतेपर्यंत जात आहेत, परिणामी ग्रामीण आणि शहरी यातील अंतर कमी होत आहे. ग्रामीण भागात भरणारा आठवडा बाजार हा महत्वाचा घटक बनला असून, त्यातुन मोठी उलाढाल होत आहे.”