जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी
डॉ. कल्याण गंगवाल; आझाद मैदानावर प्राणीप्रेमींकडून मोर्चाचे आयोजन
पुणे : “आपला देश अहिंसा, जीवदया मानणारा आहे. प्राण्यांना जगण्याचा अधिकार असून, त्यांचा छळ होता कामा नये. जिवंत प्राण्यांचीही निर्यात करताना त्यांच्यावर अनन्य अत्याचार होतात. त्यांना उपाशी ठेवले जाते. अनेक प्राण्यांचा या निर्यातीवेळी जीव जातो. त्यामुळे सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे व सारासार विचार करून जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालावी,” अशी मागणी प्राणीप्रेमी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.
मुंबईतील आझाद मैदानावर रविवारी विविध प्राणीप्रेमी संस्थांच्या वतीने जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. पुण्यातील सर्व जीव मंगल प्रतिष्ठान, ध्यान फाउंडेशन, इंडियन ऍनिमल प्रोटेक्शन फोर्स यांच्यासह इतर अनेक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्राणीप्रेमी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळाले. नव्याने निवडून आलेल्या मोदी सरकारचे संसदीय अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला हे अभियान राबवून प्राणीप्रेमींनी प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली.
निसर्ग संवर्धन आणि प्राण्यांच्या आरोग्याबाबत काही सूचना आणि आक्षेप नुकत्याच मांडलेल्या मसुद्यात नोंदवले आहेत. शेती, पाणी टंचाई, ग्लोबल वार्मिंग, हवामान बदल, प्राण्याची घटती संख्या अशा अनेक समस्यांना आपल्याला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टीला गांभीर्याने घेतले पाहिजे. प्राण्यांची निर्यात बंद करून शाकाहाराकडे आपण वळणे हेच भविष्यातील संकट टाळण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे, असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले. अमेरिकेतील जैना संस्थेचे मनीष मेहता यांनीही या अभियानाला पाठिंबा दर्शविला आहे.