पुणे : “विनायक पालेकर यांच्यासारखे अनेक दानशूर माणसे समाजात आहेत. न मागताही चांगल्या कामासाठी लाखो रुपयांची देणगी त्यांनी दिली. निरपेक्ष भावनेने दान करणाऱ्या दानशूर व्यक्तींमुळेच समाजकार्य उभे राहते. त्यातून माणुसकीचा धागा विणला जातो,” असे मत वंचित विकास संस्थेचे संस्थापक प्रा. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.
दानशूर व्यक्तींमुळेच समाजकार्य उभे राहते -प्रा. विलास चाफेकर
वंचित विकासतर्फे अरुणा-मोहन पुरस्काराचे वितरण
वंचित विकास संस्थेतर्फे दिला जाणारा ‘अरुणा- मोहन पुरस्कार’ यंदा रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा येथील आनंदधाम वृद्धाश्रमात राहणाऱ्या व तेथील व्यवस्थापन बघणाऱ्या विनायक पालेकर यांना प्रदान करण्यात आला. नव्वदीत असलेल्या पालेकर यांनी आजवर अनेक संस्थांना लाखो रुपयांची देणगी दिली आहे. अरुणा व मोहन गाडगीळ यांच्या नावाने देणगीदारांना हा पुरस्कार दिला जातो. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, खजिनदार उद्धव भडसाळकर व वंचित विकासचे कार्यकारिणी सदस्य, पालेकर यांच्या भगिनी वीणा मोये, पणतू पार्थो नाबर, गार्गी देशपांडे, आनंदधामच्या व्यवस्थापिका अंजली कडेकर, सहकार्यवाह सुमन लोंढे, लिपिक दीक्षा सोगम यांच्यासह कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. विलास चाफेकर म्हणाले, “निरपेक्ष देणग्या देणारे अनेक दाते समाजात आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरच आमच्यासारख्या सामाजिक संस्थेचे काम सुरळीत सुरु आहे. अशा दातृत्वाचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. पालेकर यांचा दानशूरपणा समाजापर्यंत पोहोचावा व त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे वाटते.”
अंजली कडेकर व सुमन लोंढे यांनी विनायक पालेकर यांचा जीवनप्रवास उलगडला. सूत्रसंचालन मीना कुर्लेकर यांनी केले.