पुणे : “छत्रपती राजर्षी शाहू महाराज, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. दलित, वंचित घटकांना न्याय आणि सन्मान त्यांनी दिला. गांधींच्या नावाने भारताची जगभरात ओळख आहे. मात्र, अलीकडे गांधी कुटुंबाची ओळख पुसण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी विचारांचा अनादर करण्याचाही प्रयत्न होत आहे. अशावेळी आपला इतिहास जपण्याची जबाबदारी आपली असून, शाहू महाराज, इंदिराजी यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणे महत्वाचे आहे,” असे मत अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी व्यक्त केले.
सिंहगड केसरी प्रतिष्ठानच्या वतीने ‘प्रियदर्शनी इंदिरा गांधी’ व ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपनिबंधक उत्तम जाधव, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, विठ्ठल वरुडे पाटील, ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी उपस्थित होते. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बारामती ऋतुराज काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “शाहू महाराजांनी राज्य कारभार मराठीत करण्यासाठी पुढाकार घेतला. दरबारातील नोकऱ्यांत आरक्षण लागू केले. राधानगरी धरणाची उभारणी केली. दलितांना आडनाव दिले. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडविणारे आहेत. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. इंदिराजी हे कणखर नेतृत्वाचे आदर्श उदाहरण आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण, खासगी सावकारीवर निर्बंध घालण्याचे निर्णय त्यांनी घेतले. बांगलादेश युद्धात शरणागतीच्या वेळी त्यांनी विजयाचे श्रेय घेतले नाही. आजचे सत्ताधारी मात्र कथित ‘सर्जिकल स्ट्राईक’चे श्रेय घेण्यासाठी धावाधाव करतात. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे.”
उत्तम जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नव्या पिढीने इतिहास समजून घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ही एक सामाजिक चळवळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऍड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोसले यांनी आभार मानले.