पुणे : “आपण निवडलेल्या क्षेत्रात एकनिष्ठ राहून काम करणे महत्वाचे असते. सर्व गोष्टींचा समतोल राखत विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम डॉ. अभ्यंकर यांनी केले आहे. निर्भीड, परखड आणि आकर्षक व्यक्तिमत्व असल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वावर त्यांची नेहमीच छाप पडली आहे. आजच्या पिढीला वळण आणि नीतिमूल्यांची शिकवण देण्याची गरज आहे. त्यासाठी डॉ. अभ्यंकर यांच्यासारखे शिक्षक असायला हवेत,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, विविध शिक्षण संस्थांमध्ये संचालक आणि प्रशासक असलेल्या प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर यांच्या वयाच्या एकाहत्तरीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, केके वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राजु इंडस्ट्रीजच्या संचालिका परिमल चौधरी, डॉ. अभ्यंकर यांच्या सौभाग्यवती चित्रलेखा अभ्यंकर, गौरव समितीचे डॉ. सुरेश माळी, डॉ. विक्रम पाटील, बापूसाहेब सूर्यवंशी यांच्यासह शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. अभ्यंकरांनी लिहिलेल्या ‘अभियांत्रिकीचा शिक्षक का आणि कसा?’ या पुस्तकाचे व ‘हेमंतरंग’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मीदेखील काहीकाळ प्राध्यापकी केली. वकिली केली. आता राजकारणात आहे. पण आपण जिथे काम करतो, तिथे प्रामाणिकपणे शंभर टक्के योगदान देण्याची आपली भावना असली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात डॉ. अभ्यंकर यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेक संस्थांची घडी बसविण्यात त्यांचा पुढाकार असतो. चांगले विद्यार्थी घडायचे असतील, तर चांगले शिक्षक हवेत. त्यासाठी डॉ. अभ्यंकरांनी पुस्तक लिहून मोहीम सुरु केली आहे. आमच्या फलटणच्या कॉलेजातही त्यांना घेऊन जाणार असून, आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळायला हवे. त्यांची पंच्याहत्तरी आमच्या राजेशाही पद्धतीने साजरी करण्याची संधी अभ्यंकरांनी द्यावी.”
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा सत्कार करताना मला आनंद होतो आहे. शिक्षकाच्या हस्ते शिक्षकाचा सत्कार हे केवळ पुण्यातच शक्य आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्राणवायू असतो, हे डॉ. अभ्यंकरांनी सिद्ध केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ अभियांत्रिकी शिक्षकांपर्यंतच मर्यादित नाही. प्रत्येक शिक्षक, प्राध्यापकांसाठी हे पुस्तक आहे. प्राध्यापक कसा असावा त्याच्या बदलाच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी या पुस्तकांत मांडल्या आहेत. आयुष्यात प्राध्यापक होताना या छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटायला लागतात. उत्तम शिक्षक घडवणे हे अभ्यंकरांचे स्वप्न आहे.”
डॉ. दीपक टिळक म्हणाले, “ज्या शिक्षकाने आपल्या जीवनात चांगले ७५ शिक्षक बनवले तो शिक्षक या जगात सगळ्यात उत्तम शिक्षक असतो. ते काम अभ्यंकर सरांनी करून दाखवले आहे. शिक्षकांचेही मार्गदर्शक असलेल्या अभ्यंकरांनी आपल्या पुस्तकात व्यक्तिगत आणि कौशल्य अशी विभागणी केली आहे. शिक्षकाने कसे असावे, काय करावे व करू नये, स्त्री-पुरुष समानता, जेष्ठ व लहानांनी कसे वागावे, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर भर दिला आहे. पण आयुष्यात ही खूप मोठी शिकवण आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी धडपड करा, तुमचा उत्कर्ष आपोआप होईल, असा संदेश त्यांनी दिला आहे.”
बाळासाहेब वाघ म्हणाले, “एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदहारण अभ्यंकर सर आहेत. शिक्षकांबद्दल स्पष्ट मत मांडण्याचे आणि लिहिण्याचे धाडस त्यांनी केले आहे. शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या पुस्तकाचा निश्चित उपायोग होईल. माझ्या अडचणीच्या काळात अभ्यंकरांनी मला खुप मदत केली. एक उत्कृष्ट सल्लागार त्यांच्या रूपाने मला मिळाला आहे.”
परिमल चौधरी यांनी आकाशवाणीमुळे डॉ. अभ्यंकरांची ओळख झाल्याचे सांगून केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही घडविणारा शिक्षक मला त्यांच्यात दिसला. शिक्षकांसाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी आपण मदत करायची हे ठरवले. शिक्षकांनाही इंडस्ट्रीज ट्रेनींग महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, “माझे स्नेही, मित्रपरिवार, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्याकडून झालेल्या या सत्कारामुळे भारावलो आहे. आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा आजच्या या सोहळ्याने दिली आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठीचे हे पुस्तक मुद्दाम मराठीत लिहिली आहे. आजवर ७५ शिक्षकांना घडवले आहे. अजून २५ शिक्षक घडविण्याचा माझा मानस आहे. चांगले शिक्षक घडण्यासाठी नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि मेहनत या गोष्टी आवश्यक आहेत. देशातील भ्रष्टाचार कमी व्हायचा असेल, तर चांगले शिक्षक निर्माण झाले पाहिजेत.”
यावेळी स्वागत गीत स्वरदा कुलकर्णी यांनी गेले, स्वागत डॉ. सुरेश माळी, प्रास्ताविक प्रा. डॉ. विक्रम पाटील यांनी केले. आभार बापूसाहेब सूर्यवंशी यांनी मानले. आशुतोष कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले.