मूल्यवर्धन, चौकटीबाहेरचा विचार आत्मसात करावा-डॉ. दीपक तोष्णीवाल
पुणे : “कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण त्या कामाच्या गुणवत्तेत भर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची वृत्ती आत्मसात केली पाहिजे. जिथे आपण काम करतो, तिथे जास्तीत जास्त चांगले योगदान देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे मत रोटरी क्लब ऑफ पुणे फॉर्च्युनचे अध्यक्ष डॉ. दीपक तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड मास कम्युनिकेशनच्या (एसआयएमएमसी) दहाव्या पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. तोष्णीवाल बोलत होते. याप्रसंगी ताण व्यवस्थापन सल्लागार व बीएनआय पुणेच्या प्राची देशपांडे, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, विभागप्रमुख प्रा. खुशाली ओझा आदी उपस्थित होते. विशाल चोंडे (प्रथम), श्रेष्ठा रॉय (द्वितीय) व कुणाल सराफ (तृतीय) या विद्यार्थ्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आपण निवडलेल्या क्षेत्रात व्यावसायिक ओळख निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असायला हवा. मूल्यांवर विश्वास ठेवत सतत शिकण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. सुर्यदत्ता संस्थेकडून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित आणि आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्याचाच एक भाग म्हणून आयआयएमबीएक्स, एआयएमए, इनोव्हेशननेक्स्ट, गुगल आदी संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. शैक्षणिक जीवनातील त्याग व्यावसायिक आयुष्यात यशप्राप्ती देतो. आजच्या युवकांनी उद्योजकतेकडे वळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.”
प्राची देशपांडे म्हणाल्या, “तणावाचे व्यवस्थापन करण्यासोबतच काम आणि दैनंदिन जीवन याचा समतोल राखता आला पाहिजे. तणावाच्या परिस्थितीतूनही मार्ग काढण्याची कला अवगत केली पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन करायला हवे.” आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी प्रा. खुशाली ओझा यांनी मार्गदर्शन केले. प्रा. चारुशीला मोहिती यांनी आभार मानले.