बाल साहित्य बोजड, बोधवादी असू नये -भानू काळे
पुणे : “बालसाहित्य निर्मिती ही आनंददायी गोष्ट आहे. त्यामध्ये बोजडपणा, क्लिष्टता आणि केवळ बोधवादी भूमिका असू नये. सर्वांना समजेल, आवडेल आणि मनोरंजनातून बोध घेता येईल, अशा हलक्याफुलक्या स्वरूपाचे लेखन बालसाहित्यिकांनी करावे. बालसाहित्यातून मुलांवर संस्कार होत असतात. त्यामुळे समाजप्रबोधन व परिवर्तन यामध्ये बालसाहित्याची भूमिका महत्वाची ठरते,” असे मत ज्येष्ठ संपादक-पत्रकार भानू काळे यांनी व्यक्त केले.
वंचित विकास संस्थेच्या निर्मळ रानवारा आणि सुश्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित वि. ल. शिंत्रे पुरस्काराच्या वितरणप्रसंगी भानू काळे यांची मुलाखत पत्रकार श्रीराम ओक यांनी घेतली. यावेळी उकृष्ट कथा लेखनासाठी उत्तम सदाकाळ (प्रथम), माधवी सोमण (द्वितीय), स्वाती देवळे (तृतीय), आर्या जोशी (उत्तेजनार्थ) आणि चारुता प्रभुदेसाई (उत्तेजनार्थ) यांना शिंत्रे पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसंगी वंचित विकासचे विलास चाफेकर, विजयकुमार मर्लेचा, मीनाताई कुर्लेकर, ज्योती जोशी, सुप्रिया कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भानू काळे म्हणाले, “कथेच्या यशासाठी लेखकाची प्रतिभा, वाचन आणि भाषेवरील प्रभुत्व महत्वाचे असते. वाचनातून बोध मिळणे हे लेखकावर अवलंबून असते. व्यक्तिगत आयुष्य आणि लेखक-कलावंतांची कलात्मकता यात फरक असू शकतो. तो आपण समजून घेतला पाहिजे. श्यामची आई सारखे लेखन आजही प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे कारण साने गुरुजींची कलात्मक प्रतिभा आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्य यामध्ये फार तफ़ावत नव्हती.” श्रीराम ओक यांनी सूत्रसंचालन केले.