माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी सहायक समितीला एक कोटीची देणगी
दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांच्याकडून समितीच्या नव्या वसतिगृहासाठी पाच कोटीची देणगी देण्याबाबत सामंजस्य करार
पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवा परिवर्तन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी सहायक समितीला माजी विद्यार्थ्यांकडून एक कोटी रुपयांची देणगी सुपूर्त करण्यात आली. विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांच्याकडे माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने एक कोटी रुपयांचा धनादेश शनिवारी देण्यात आला. तसेच या दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांच्याकडून समितीच्या नव्या वसतिगृह उभारणीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याच्या सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील डॉ. अच्युत शंकर आपटे वसतिगृहात झालेल्या या सोहळ्यावेळी समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी, भाऊसाहेब जाधव, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, खजिनदार दिनकर वैद्य यांच्यासह माजी विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतापराव पवार म्हणाले, “माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला, हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते. समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी नेहमीच संस्थेच्या हितासाठी काम केले आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी या निधीची मदत होईल. निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला जाईल. समितीच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा यापुढेही असाच सहभाग राहावा, अशी अपेक्षा आहे.”
समाजहितासाठी दिलेले पैसे गरजूंपर्यंत पोचतात की नाही याबाबत शंका असल्याने लोक मदत करीत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी मदत केलीच पाहिजे. माझी मुले म्हणतात की, तुम्ही गेल्यानंतर तुमची संपत्ती आम्हाला नको, तुम्ही ती दान करा. कारण आम्ही सक्षम आहोत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे वडिलांचे स्वप्न होते. पण त्यांना ते पूर्णत्वास नेता आले नाही. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. वसतिगृहाचा फायदा झालेल्या १० टक्के विद्यार्थ्यांनी समाजसेवा केली, तरी त्याचा चांगला परिणाम होवू शकतो.” अशी भावना समितीला ५ कोटी रुपयांचा निधी देणारे विनोद जाधव यांनी व्यक्त केली.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “एक हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह तयार करायचे असे स्वप्न आहे. विजय कदम यांनी समितीसाठी व्यक्तीगत भरीव मदत केली. तसेच जाधव यांना विनंती केल्याने ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होवू शकला. जाधव यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या देणगीचे महत्त्व वेगळे आहे. समाजिक जाण ठेवत त्यांनी पाच कोटी रुपये दिले. त्यांनी आत्तापर्यंत अनेक संस्थान मदत केली आहे. यापुढेही ते मदत करीत राहतील असा विश्वास आहे.”
रमाकांत तांबोळी म्हणाले, “लोकांना चांगल्या कामासाठी पैसे द्यायचे आहेत. मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे. १० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे ध्येय आहे.” गायकवाड म्हणाले, “हे वसतिगृह नसून युवा परिवर्तन केंद्र आहे. आईवडिलांविषयी श्रद्धा असते तशी आमची समीतीविषयी धारणा आहे. माझी विद्यार्थ्यांची ताकद अशीच समितीच्या मागे उभी राहिली तर आपण भारतभर पोहचू.” एक कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याने रमाकांत तांबोळी यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन सुप्रिया केळवकर यांनी केले. आभार जीभाऊ शेवाळे यांनी मानले.