पुणे : “महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समानतेचा आदर्श घालून दिला. त्याच वाटेवर महात्मा गांधी (बापू) आणि कस्तुरबा गांधी (बा) यांचे सहजीवन प्रेरणादायी आहे. अखेरच्या काही दिवसांत बा आणि बापू यांच्यातील भावनिक नाते, करावासातील दिवस, कस्तुरबांचे, सहकारी महादेवभाई देसाईंचे निधन, बापूंच्या मनातील अस्वस्थता यासह अनेक गोष्टींचा दैनंदिनी स्वरूपातील आढावा आपल्याला बापू नव्याने उलगडणारा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले.
कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट इंदोर महाराष्ट्र शाखा, सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य ‘बा’ अर्थात कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी सुनीती सु. र. बोलत होत्या. हिंदी लेखिका स्वर्गीय डॉ. सुशीला नैय्यर लिखित मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शोभनाताई रानडे यांनी केला आहे. आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा स्मृती सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष धीरूभाई मेहता, अध्यक्ष डॉ. करुणाकर त्रिवेदी, उपाध्यक्षा गायत्रीदास दीदी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे उपस्थित होते.
सुनीती सु. र. म्हणाल्या, “डॉ. सुशीला बापूंच्या सोबत होत्या. त्यामुळे बापूंचे दैनंदिन जीवन त्यांनी शब्दबद्ध केले होते. डॉ. शोभनाताईंनी समर्पक असे त्याचे मराठीत रूपांतर केले आहे. आगाखान पॅलेसमधील त्या भरलेल्या दिवसांची आठवण या पुस्तकामुळे होत आहे. त्याचबरोबर आजच्या गंभीर कालखंडात हे पुस्तक दिशा दाखवणारे ठरेल. लोकशाही वाचविण्यासाठी या पुस्तकातील मूल्ये उपयुक्त ठरतील.”
अरुण खोरे म्हणाले, “गांधी दाम्पत्याच्या शेवटच्या काळातील सहजीवन उलगडणारे हे पुस्तक आहे. आगाखान पॅलेसमधील दिवस हे भारताच्या इतिहासाला वळण देणारे होते. कस्तुरबांविषयीच्या लेखनाला लेखकांनी उशिरा सुरुवात केली. परंतु, अलीकडे चांगली पुस्तके येताहेत, ही आनंदाची बाब आहे. आजच्या गढूळ वातावरणात अशा प्रकारची पुस्तके मार्गदर्शक ठरतील.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. करुणाकर त्रिवेदी म्हणाले, “गांधीजींनी आपले महत्वाचे दिवस पुण्यात आणि महाराष्ट्रात घालवले. त्यांचे कार्य नव्या पिढीला समजण्यासाठी अशी पुस्तके व्हायला हवीत. लवकरच या पुस्तकाला डिजिटल स्वरूपात आणले जाणार आहे. गांधी विचार पोहोचवण्यासाठी ट्रस्ट नियमितपणे कार्यरत आहे.”
धीरूभाई मेहता, गायत्रीदास दीदी, डॉ. शोभनाताई रानडे यांनीही मनोगते व्यक्त केली. पुस्तकनिर्मितीतील सहकार्याबद्दल हनुमंता जगनगडा, चतुराताई यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन शेवंताताई चव्हाण यांनी केले. आशा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. गणेश धोत्रे यांनी आभार मानले.