विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर हवा -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पुणे : “भारतीय परंपरा, संस्कृती आणि इतिहास अतिशय समृद्ध आहे. नव्या पिढीला त्याविषयी जागृत करणे हे आपले दायित्व आहे. केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण संस्थांनी काम केले पाहिजे. त्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट असायला हवे. पूर्वजांनी केलेल्या भरीव कार्याची माहिती त्यांना द्यायला हवी. तसेच आपल्या भाषेविषयीचा आदर जपण्याची तसेच, जागतिक स्तरावर टिकण्यासाठी उपयुक्त शिक्षण देण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
‘जागरणजोश’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन वेस्ट इंडिया अवॉर्ड’ पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला बुधवारी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्याला जागरण प्रकाशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक महेंद्र मोहन गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता व भारत गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पश्चिम भारतातील व्यवस्थापन महाविद्यालयांच्या क्रमवारीतील पहिल्या चारमध्ये सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने स्थान पटकावले होते. ‘सूर्यदत्ता’बरोबरच देशातील एकूण २० नामांकित संस्था व विद्यापीठांच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. भारतातील व्यावसायिक महाविद्यालयांच्या (बी-स्कुल) सर्व्हेक्षणातून या २० उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यात आली. विद्यार्थी आणि उद्योगांच्या दृष्टिकोनातूनही विविध पैलूंचे विश्लेषण केले गेले आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर ‘महाविद्यालय स्तरावर होत असलेली कौशल्य विकासासाठीचे प्रयत्न आणि तंत्रयुगातील नोकऱ्यांच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना घडवणारे नवउपक्रम’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात डॉ. संजय चोरडिया यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योगातील मनुष्यबळ अधिकारी सहभागी झाले होते.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत शैक्षणिक कौशल्याच्या माध्यमातून कृती आणि विचारांतून स्वातंत्र्याची भावना रुजवली जाते. क्षेत्रभेटी, छोटे प्रकल्प, उद्योजकता विकास यातून विद्यार्थ्यांना स्व-कार्यक् षमतेसाठी मदत होते. सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कॅम्युनिकेशन (एसआयएमएमसी) महाविद्यालय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गौरव केलेला आहे. ‘नॅक’च्या मानांकन यादीतही महाविद्यालयाचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून एआयसीटीई-सीआयआय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाविद्यालयाला क्रमवारीत स्थान मिळालेले आहे. या यशाचे श्रेय टीमवर्कला असून, सर्व संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सातत्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे.”