मराठी साहित्य जात-जाणिवेतच अडकले
‘जात प्रभुत्व आणि मराठी साहित्य’ या परिसंवादातील मान्यवरांचा सूर
पुणे : जाती प्रभुत्व याचा विचार करताना इतिहास, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि पर्यायाने आलेली पुरुषसत्ताक पद्धती, चार वर्ण, स्त्रिया, वंचित, क्षुद्र असा सगळ्यांचाच व्यापक विचार अपेक्षित आहे. या सगळ्याचा उहापोह साहित्यात होणे गरजेचे आहे. मात्र, मराठी साहित्य जात जाणिवेतच अडकल्याचा सूर ‘जात प्रभुत्व आणि मराठी साहित्य’ या परिसंवादात उमटला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्या परिसंवादात ज्येष्ठ समीक्षक प्रा. हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक हृषीकेश कांबळे, प्रा. रुपाली शिंदे, दिलीप चव्हाण, प्रा. नीळकंठ शेरे, राहुल कोसंबी, लेखक शरद गायकवाड सहभागी झाले होते.
थोरात म्हणाले, “ऐतिहासिक साहित्यशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्यांचाच विचार करत जाती प्रभुत्वाचा विचार होतो. साहित्याच्या समाजशास्त्राचा विचार नगण्य केला जातो. खरं तर तो होणे आवश्यक आहे. ते करण्याची जबाबदारी समाजशास्त्रज्ञांची आहे. मात्र प्रत्यक्षात समाजशास्त्रज्ञाना साहित्याची आणि साहित्यिकांना समाजशास्त्राची आवड नसल्याने हे होते.”
शिंदे यांनी या परिसंवादाचे लक्ष जाती आरक्षण व अर्थकारण याकडे वळवत सांगितले, “सध्या जातीचे राजकारण अरक्षणाभोवती फिरत आहे. आणि आरक्षणाला आर्थिक सक्षमीकरणाचा दृष्टिकोन दिला जात आहे. मात्र यामुळे जातिजातीत तेढ निर्माण होत आहे. तसेच पुरुषसत्ताक पद्धती यातील एक वंचित गटांनी त्याचे साहित्य असा सर्वांगीण विचार करावा लागेल.”
गायकवाड म्हणाले,”भारत जातीप्रधान देश आहे. जात ही महारोग, संसर्गजन्य आजरा सारखे पसरत आहे. यातून मानवतेचे नुकसान होते. वेदनेला जात नसते पण जातीतून निर्माण झालेली वेदना फार भयानक असते. कितीही मोठे आघात झाले तरी जात जाणार नाही. आणि माणूस व साहित्य हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहे.”
चव्हाण म्हणाले,”भारताचा इतिहास हा चातुरवर्णाचा आणि स्त्रियांच्या दमनाचा आहे. इतिहासातील हे संघर्ष व तणाव सातत्याने सुरू आहे. वरच्या वर्णाने साहित्य निर्मितीतून प्रभुत्वाचा प्रयत्न केला तर वंचित दलितांनी साहित्यातून ते प्रभुत्व हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. जातीने पितृसत्ताक घडविले तर पितृसत्ताकांनी जात घडविली आहे.”
शेरे म्हणाले, “वंचितांचा इतिहास खंडित असतो. मराठी साहित्यात वंचितांचे साहित्य म्हणजे आचिकित्सकपणे सर्वच व्यवहार जाणण्याची प्रवृत्ती असते. आयडॉलॉजी उभी करण्याचे साधन म्हणून साहित्याकडे बघू शकतो.”
मराठी साहित्य हे जात जाणिवांच्या बाहेर पडलेले साहित्य नाही, असे सांगत कांबळे म्हणतात, “जातीचं मोजमाप हे वरून खाली असे केले जाते. जगभरात पसरलेल्या ग्रामीण, दलित साहित्याची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे. मराठी साहित्याच्या जातीच्या सीमारेषा ओलांडलेल्या नाही.”