साहित्य हे समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब
सम्यक साहित्य संमेलनात ‘मी आणि माझे लेखन’ यावर परिसंवाद
पुणे : “साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब, विवेकवादी विवेचन असते,” असा सूर ‘मी आणि माझे लेखन’ या परिसंवादात व्यक्त झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनातील तिसऱ्या परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार मांडले. या परिसंवादात युवा कवी सुदाम राठोड, लेखक राकेश वानखेडे, श्रीकांत देशमुख, सुरेश पाटोळे, इंदुमती जोंधळे, वृषाली मगदूम सहभागी झाले होते. मंगेश काळे हे अध्यक्षस्थानी होते.
कवितेला संताप, वेदनेबरोबरच विवेकाची जोड असावी असे सांगत राठोड म्हणाले, “भाषेवरील प्रभुत्व आणि भावनिक राजकारण करता आले म्हणजे चांगली कविता करता येते असे नाही. त्यासाठी विवेक आणि जाणिवा जाग्या असणे आवश्यक आहे. साहित्याला वैश्विक होण्यासाठी दलित साहित्याची गरज पडली. करण यात वेदना, संताप याबरोबरच विवेकाची जोड होती. सर्वच वंचित, शोषितांचे साहित्य म्हणजे दलित साहित्य. पण सतत आक्रोश, वेदना, विद्रोह हेच म्हणजे दलित साहित्य ही संज्ञा होणे चुकीचे आहे. कोणतीही फक्त दुःखाची भावना फार काळ टिकत नाही.”
वानखेडे म्हणाले, “माझ्या लहानपणी फार शिक्षण नव्हते त्यामुळे माझे आजोबा मला पत्र लिहायला सांगायचे. ते बोलत राहत त्यातून नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही हे समजून लिहू लागलो, हा लेखनाचं माझा पहिला धडा होता. आजचा समाज, समस्या यांचे आकलन, वाचन आणि त्यावर तुमचे भाष्य हे तुमचे लेखन असते. कादंबरी हा लोकशाही शी हातात हात घालून चालणार प्रकार आहे.”
आपण ज्या वातावरणात वाढलो ते अनुभवच आपल्या लेखनाची प्रेरणा ठरल्याचे सांगत जोंधळे म्हणाल्या, “जीवनासाठी, भलबुरेपणासाठी, आणि काय चालले आहे हे समजण्यासाठी कलेचं उपयोग व्हायला हवा. माझी लेखनाची नाळ जीवनाशी आहे. सामाजिक, आर्थिक दंगलीकडे साक्षीभावाने बघताना ते माझ्या आतून व्यक्त होते. आजूबाजूला जे घडत आहे ते बघताना कोणताही संवेदनशील माणूस शांत बसूच शकत नाही. अनुभूतीच्या जाणिवांचा तसेच चिंतन, मनन आणि माणुसकीचा ओलावा लेखनात असायलाच हवा.”
देशमुख म्हणाले,”कवी, लेखक हे जे वंचित, निराश, दुःखात आहेत त्याविषयी बोलत असतात. त्यामुळे जर कलावंत, साहित्यिक यांना केंद्रस्थानी ठेवले तरच सुधारणा होऊ शकते. ज्यांना चेहरा नाही अशांविषयी ते लिहितात. जगण्याचे उर्ध्वपातन म्हणजे लेखन.”
जीवन आणि लेखन प्रवास हे एकमेकांना जोडलेले आहेत असे सांगत मगदूम म्हणाल्या,”भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार म्हणजे साहित्य. मी जे अनुभवत गेले, बघत गेले त्यातून माझे लेखन सुरू झाले. एखाद्या स्त्रीच्या समस्येसाठी आंदोलने, संघर्ष, मोर्चे करताना मी फार अस्वस्थ असे पण एकदा तो प्रश्न सुटला की मी माझ्या भावनांचा निचरा कथा लेखनातून करते.”
काळे म्हणाले, “प्रत्येकाने सुरुवातीच्या काळात संतापी असावे आणि स्थिरावले की संशयी व्हावे म्हणजे लेखन फुलते. कोणत्याही साहित्यनिर्मितीसाठी रियाज आवश्यक असतो. कला फक्त जीवनवादी किंवा कालवडी नसावे. या दोहोंचा योग्य मेळ त्यात साधलेला असावा.”
माणसाच्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करतो, असे पाटोळे यांनी सांगितले.