पुणे : “आयुर्वेद ही भारताची पाच हजार वर्षांची आरोग्य परंपरा आहे. अनेक दुर्धर आजारांना बरे करण्याची आणि आजार होऊच नयेत, याची क्षमता असलेले हे आरोग्यशास्त्र आहे. आयुर्वेद ही शाश्वत अशी शास्त्रोक्त उपचारपद्धती असून, भारतीयांनी आयुर्वेदाला प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
ऍलोपॅथिक डॉक्टर असलेल्या गौरी अभ्यंकर-कर्वे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथे साकारलेल्या ‘आयुर्ब्लीस’ या आयुर्वेद व पंचकर्म केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुक्ता टिळक बोलत होत्या. यावेळी स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, डॉ. गौरी अभ्यंकर-कर्वे, शारंगधर फार्माचे संचालक आणि सनदी लेखापाल मुकुंद अभ्यंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुक्ता टिळक म्हणाल्या, “ऍलोपॅथी व आयुर्वेद याचा संगम होतोय, ही आनंदाची बाब आहे. आज अनेक उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे अशा पारंपरिक उपचारांना आधुनिकतेची जोड मिळाली, तर सर्वांनाच त्याचा लाभ होऊ शकेल. स्टार्टअप, इनोव्हेशनच्या काळात डॉ. गौरीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.”
माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, “आपले आरोग्य अंतर्बाह्य सुंदर ठेवण्याचे काम आयुर्वेद करते. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. प्रतिबंधात्मक उपचार देण्यासह आरोग्याला शिस्त लावण्याचे काम आयुर्वेद करते. आपण सर्वानी त्याचा अवलंब केला पाहिजे.”
डॉ. गौरी अभ्यंकर-कर्वे म्हणाल्या, “रुग्णाच्या प्रकृतीचा अभ्यास करून आधुनिक व पारंपरिक उपचारपद्धतीचा मेळ घालत त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. योगासह आहार नियोजन आणि आयुर्वेदिक उपचारांना आधुनिक पद्धतीने प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”