… तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल -डॉ. नरेंद्र जाधव
पुणे : “गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझर्व्ह बँकेची स्वायतत्ता काढली, तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर एखाद्या राज्याच्या राज्यपालाप्रमाणे नामधारी होईल. त्यामुळे ही स्वायत्तता कायम राहायला हवी,” असे प्रतिपादन केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स डिस्ट्रिक्ट 3234 डी 2, लायन्स इनोव्हेशन फोरम, आकुर्डी येथील सूर्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देणे लायनीझमचे-लेणे व्याख्यानमालेचे’ या लायन्स व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात डॉ. जाधव ‘भारतीय अर्थव्यवस्था : आजची व उद्याची’ यावर बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते झाले. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा, जितो पुणे व विश्वकर्मा विद्यापीठ या संस्था या उपक्रमासाठी सहयोगी आहेत.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या व्याख्यानमालेवेळी अक्षरधाम, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे परमपूज्य स्वामी ज्ञानवत्सल, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल अभय शास्त्री, व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक लायन प्रकाश नारके, लायन शरद पवार, लायन राजेंद्र गोयल, लायन दिलीप निकम, लायन शाम खंडेलवाल, सूर्या ग्रुपचे योगेश वाके उपस्थित होते. यावेळी सीए आनंद जाखोटिया व सीए यशवंत कासार यांचा ‘आयसीएआय’च्या रिजनल कौन्सिल मेम्बरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. जाधव म्हणाले, “गेल्या दोन दशकात चीन आणि भारत जगाच्या आर्थिक पटलावर चांगली कामगिरी करत आहे. अमेरिका, युरोप, जपान यांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या. अशा स्थितीतही भारत आणि चीनने आपली परिस्थिती सावरली. जीएसटी, नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला. परंतु, त्यातून ती सावरत आहे. येत्या काळात अमेरिका, युरोप, जपानची अर्थव्यवस्था पुन्हा मांडण्याची चिन्हे आहेत. चीनला आपण मागे टाकले, हे खोटे असून, १९९० पर्यंत चीन-भारत समांतर होते. आज चीन पाच पटीने पुढे आहे. तेल व्यापारात अमेरिका, रशियाच्या प्रवेशामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. शिवाय, अमेरिकेने इराणवर आणलेल्या निर्बंधामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो आहे. याचा परिणाम म्हणजे येत्या काळात तेलाच्या किमती चढ्या राहणार आहेत.”
“वस्तू व सेवा कर (जीएसटी) क्रांतिकारी निर्णय आहे. त्याच्या अंमलबजावणीत गडबड झाल्याने त्यावर टीका झाली. येत्या काळात त्याची रचना दोन स्लॅबवर आणली जाणार असून त्यामुळे कररचना व्यवस्थित होईल. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. शेती क्षेत्र कोलमडले असून, आर्थिक संस्था डबघाईला आल्या आहेत. मुद्रा लॉनमधून अनेकांना रोजगार मिळाल्याचा दावा साशंक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत नोकऱ्या महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी एखादी घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात विकासदर ८ ते ९ टक्के यामध्ये राहिला, तर भारताचे आर्थिक भविष्य उज्ज्वल आहे,” असे डॉ. नरेंद्र जाधव यांनी नमूद केले.
‘सुखाची परिभाषा आणि जीवनाची श्रीमंती’ या विषयावर बोलताना स्वामी ज्ञानवत्सल म्हणाले, “नैतिकतेने केलेले अर्थार्जन, वितरण, विनियोग, सेवा-दान आणि वारस या पाच गोष्टी योग्य रीतीने झाल्या, तर आयुष्य सुखाचे होते. आज एकविसाव्या शतकात सुखाची परिभाषा भौतिक गोष्टींवर अवलंबली आहे. मोह, आकांक्षा वाढत असल्याने जीवनात दुःखे येत आहेत. धन, वैभव, समृद्धी कमी-जास्त झाले, तरी आपले सुख कमी होणार नाही, अशी विचारधारा आपण जोपासली पाहिजे. नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणे कमावलेले धन सुख देणारे असते. चुकीच्या मार्गाने धन जोडू नये. शासनाच्या धोरणामुळे आपण आपला व्यवसाय, अर्थार्जन प्रगत होतो. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरायला हवा. आपण ‘जीएसटी’ भरला, तर ‘गॉड सेव्ह टेन्शन’ हा दिलासा आपल्याला मिळेल. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान आपल्या यशात असते. त्यांच्याप्रती कृतज्ञ असावे. वाईट गोष्टींवर खर्च टाळणे, कमाईतील काही भाग अध्यात्म आणि समाजासाठी देणे, चांगल्या वारसाच्या हाती आपली संपत्ती देणे आपले जीवन सुखी बनवेल.”
विजय कुवळेकर म्हणाले, “वैचारिक खुलेपणा असण्याची आज गरज आहे. मतभेद असावेत, पण मतद्वेष असू नयेत. समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी वैचारिक मंथन होणे आवश्यक असून, व्याख्यानमालेतून ते शक्य आहे. भाषा-संस्कृतीचे आदानप्रदान कमी होत आहे. इतरांचे विचार ऐकण्याची सहिष्णुता विकसित व्हायला हवी. सद्यस्थितीत व्याख्यानांना श्रोतावर्ग मिळण्याची चिंता असताना व्याख्यानमाला सुरु करणे हे धाडसाचे काम आहे.”
रमेश शहा म्हणाले, “इंटरनेट-सोशल मीडियाच्या जाळ्यात समाज अडकला आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि विचारांना दिशा मिळण्यासाठी व्याख्यानमाला उपयुक्त ठरेल. प्रत्यक्ष वक्त्यांचे विचार ऐकण्याची अनुभूती आपल्याला या व्याख्यानमालेतून मिळणार आहे.”