पर्यावरणपूरक सुपारीच्या पानांच्या प्लेटवर अबालवृद्धांनी रंगवला कॅनव्हास
सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनलतर्फे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा
पुणे : ‘सेव्ह अर्थ’, ‘गो-ग्रीन से नो टू प्लास्टिक’, ‘प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत अबालवृद्धांनी पर्यावरणपूरक सुपारीच्या पानांच्या प्लेटवर कॅनवास रंगवला. पुण्यातील विविध शाळांमध्ये सकाळपासूनच चित्र काढण्याची लगबग चालू झाल्याने ‘तारे जमीन पर’ची अनुभूती आली. ‘से नो टू प्लास्टिक’ ही संकल्पना घेऊन पुण्यातील सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल या संस्थांनी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
पुण्यात मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल, बालशिक्षण मंदिर, अहिल्यादेवी कन्याशाळा, राजा शिवराय प्रतिष्ठान, दरोडे स्कुल, राजीव गांधी इंटरनॅशनल स्कुल, महेश विद्यालय, दामले प्रशाला या शाळांमध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत ही स्पर्धा झाली. जवळपास १० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व प्रौढांनी या स्पर्धेत भाग घेतला. ट्रॅफीक पोलीस, रिक्षावाले काका, पालक, शिक्षक व स्वतः मुख्याध्यापकानींही चित्रे रंगवली. सुपारीच्या पानांपासून बनवलेल्या प्लेटवर आकर्षक रंगसंगती आणि अनुरूप संदेश देणारी ही बोलकी चित्रे सगळ्यांचेच लक्ष वेधत होती.
कटारिया हायस्कुल येथे झालेल्या स्पर्धेवेळी ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, बाबा कुलकर्णी, संयोजिका सुपरमाइंडच्या मंजुषा वैद्य, दया कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ युवाचे श्रीकांत जोशी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात आली असून, या उपक्रमाचे वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाल्याची अधिकृत घोषणा नागपूर येथे केली गेली व उपक्रमाचे प्रमुख मुकुंद पात्रीकर याना याचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. प्रत्येक शाळांतील पहिल्या दहा चित्रांना पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेला माँटेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनीच अतिशय उत्कृष्ट चित्रे काढली आहेत. ही स्पर्धा भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, गुजरात, तामिळनाडू, ओरिसा यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी झाली. ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश या चित्रकला स्पर्धेतून दिला गेला. यातील उत्कृष्ट चित्रांची निवड करून लवकरच त्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे मंजुषा वैद्य म्हणाल्या.