पुणे- पूररेषेत झालेली बांधकामे मग ती परवानग्या दिलेली असो ,किंवा न दिलेली असो अशा सर्व बांधकामांची तसेच नाल्याच्या संरक्षक भिंतीचे अंतर आणि त्यांचा दर्जा याबाबत चौकशी आचारसंहिता संपल्यावर करून पुराची कारणे आणि अहवाल पाहून योग्य ती कारवाई करण्यात येईल .मात्र अनपेक्षितपणे झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवली असली तरी प्रशासनाने ती व्यवस्थितपणे हाताळली आहे असा दावा आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे केला .
पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज पुण्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, भाजपा शहर अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ आदींची याप्रसंगी उपस्थित होती.
पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी आणि मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील घटनास्थळाची पाहणी केली आहे. अनपेक्षितपणे झालेल्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, अशा घटनेच्या वेळी कोणीही राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी ते म्हणाले की, पुणे शहरात अपेक्षे पेक्षा जास्त प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने बुधवारी रात्री मुसळधार पावसाला पुणेकरांना सामोरे जावे लागले. यात नाहक १४ जणांचा मृत्यू, तर ९ जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ९ बेपत्ता व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेण्याचे काम सुरू असून, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक स्वरूपाची मदत नियमानुसार केली जाणार आहे. तसेच, सांगली आणि कोल्हापूर येथील परिस्थितीचे नियम देखील लागू करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. याबाबत लवकरच निवडणूक आयोग निर्णय जाहीर करेल असेही त्यांनी सांगितले.
टांगेवाला कॉलनी परिसरात काहींचे राजकारण
पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे टांगेवाला कॉलनी परिसरात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी भेट देण्यास गेले असता. तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना याबाबत राजकारण करायचे आहे. त्यांना करू द्या, मी तिथे जाऊन. तेथील स्थानिक रहिवाशांशी बोललो आहे. त्या सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. साधारण अर्ध्या तासानंतर बाहेरील काही २० ते २५ नागरिक येऊन गोंधळ करण्याचा प्रकार केला आहे. असे स्पष्टीकरण त्यावर त्यांनी दिले.