पुणे. :- पुणेकरांनी या शहराला पहिली डिजिटली स्मार्ट सिटी बनवावे. देशामध्ये डिजिटल क्रांती आणण्याची सुरूवात येथून व्हावी आणि पुणे हे पहिली कॅशलेस शहर करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केंद्रीय ऊर्जा, कोळसा, नवीन व पुनर्नवीकरणीय खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियूष गोयल यांनी रविवारी केले. सर्वात स्मार्ट सिटी होण्याची क्षमता पुण्यात असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री. गोयल हे पुणे आयएनसी कॉन्क्लेव्हच्या डिमॉनेटायजेशन टू रिमॉनेटायजेशन या कार्यक्रमात बोलत होते. गोयल गंगा ग्रुपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टीव्ही १८च्या व्यवस्थापकीय संपादिका शिरीन भान यांनी श्री. गोयल यांची मुलाखत घेतली आणि निश्चलनीकरणाचा निर्णय, त्याचे परिणाम आणि खासकरून कॉर्पोरेट जगतावरील परिणाम याबाबत त्यांना बोलते केले. पुण्यातील उद्योगविश्वातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यात अतुल चोरडिया, कृष्णकुमार गोएल, सुधीर दरोडे, कुमार गेरा, प्रवीण अगरवाल यांचा मुख्यत्वे समावेश होता. क्रेडाई, एमसीसीआयए, फिक्की, फ्लू यांसहित सर्व व्यावसायिक संघटनांनी तसेच युवकांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता.
पुण्यात येण्यास आपल्याला नेहमीच आनंद होतो कारण येथे अत्यंत बुद्धिमान लोकांशी चर्चा होते, अशी सुरूवात करून श्री. गोयल म्हणाले, “निश्चलनीकरण हा शब्द या संदर्भात योग्य नाही तर अधिक मूल्याच्या नोटा रद्द करणे, हाच शब्द योग्य आहे. हा ऐनवेळी घेतलेला किंवा अचानक असा निर्णय नव्हता. दीर्घकाळापासून नियोजन करून हा निर्णय घेतला, असे मला वाटते. अगदी मोजक्या लोकांना त्याची माहिती होती आणि येथे उपस्थित असलेल्यांना जेवढा धक्का बसला तेवढाच मलाही त्याने धक्का बसला. ही अत्यंत ऐतिहासिक कृती असल्यामुळे आम्ही सगळेच रोमांचित झालो होतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या अचानक निर्णयाच्या वेळेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, की संसदेचे अधिवेशन तोंडावर होते आणि त्यानंतर काही निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होणार होती. एक आठवड्याचा वेळ देण्याच्या विरोधकांच्या मागणीची खिल्ली उडवताना ते म्हणाले, की देशाला हा निर्णय आवडला आहे मात्र काही नेते नाराज आहेत कारण त्यांना खोलवर जखम झाली आहे. निश्चलनीकरणाला संघटीत लूट म्हणणाऱ्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही त्यांनी टीका केली. “राष्ट्रकुल स्पर्धा किती संघटीत होत्या, १.७० लाख कोटी रुपये २जी घोटाळ्यात आणि १.८६ कोटी रुपये कोळसा घोटाळ्यात गेले ते किती संघटीत होते, हे सर्वांना माहीत आहे,” असे ते म्हणाले.
या पावलामागची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, “निश्चलनीकरण म्हणजे केवळ नोटा बदलणे नाही – तर काळ्या पैशावर हल्ला करणे होय. इमानदार का सम्मान और चोर का अपमान हा आमचा सिद्धांत आहे. सवयी बदलण्याची ही गोष्ट आहे. रु. ५००० आणि रु. १०००० च्या नोटा आणण्याचा प्रस्ताव आमच्या सरकारने स्वीकृत केला नाही. खोट्या नोटा आणि दहशतवाद्यांना निधी पुरवठाही आम्हाला संपवायचे आहेत. लोकांना आश्चर्याचा धक्का देणे आणि नोटा साठवणाऱ्यांना धडकी भरविणे, हा त्यातला हेतू आहे. बँकेतून देण्यात आलेल्या १००० रुपयांच्या नोटांपैकी केवळ अर्ध्या आणि ५०० रुपयांच्या नोटांपैकी केवळ एक तृतीयांश नोटा परत व्यवस्थेत येतात, असे आरबीआयला आढळले होते. हा पैसा कुठेतरी साठवून ठेवण्यात आला असेल. या पावलातून जमा करण्यात आलेला पैसा गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला जाईल.”
“हे पाऊल हे भारताला कॅशलेस बनविण्याच्या दिशेने उचलण्यात आले आहे. पूर्वीसारखा पैसा साठविणे लोकांना धोक्याचे वाटेल म्हणून यामुळे भ्रष्टाचार कमी होईल. डिजिटल बँकिंग हेच भविष्य असून त्यामुळे आर्थिक सर्वसमावेशकता येईल. लोक करचुकवेगिरी करतात ते आवड म्हणून नाही तर ते त्यांना भाग पडते म्हणून. बँकांमध्ये अधिकाधिक पैसा आल्यामुळे आणि चलनवाढ कमी झाल्यामुळे व्याजदर कमी होतील आणि परवडणारी घरे उपलब्ध होतील. भारतातील गरीब लोकांचे कल्याण हेच आमचे पहिले प्राधान्य आहे,” असे ते म्हणाले.
प्राप्तिकर बंद करण्याची कल्पना त्यांनी पूर्णपणे खोडून काढली तसेच असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगून ते म्हणाले, “आपण काय करत आहोत, हे पंतप्रधान मोदी यांना माहीत आहे. आणखी अनेक बाबी होणार आहेत. येणाऱ्या पैशांचा सदुपयोग करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. उद्योग आणि व्यवसायांना यातून लगेच फायदा मिळणार नाही, मात्र त्यांनी दीर्घकाळात लाभ होईल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोएल म्हणाले, “पुणे ही स्मार्ट सिटी आहे आणि ती तशीच राहील. आम्हा सजग नागरिकांना या महान कार्यात सहभागी होण्याचा अत्यंत आनंद आहे.”