पुणे : मावळ येथील गोळीबारासंदर्भात माझ्या विरोधात कोणतेही संभाषण विरोधकांकडे असल्यास राजकारणातून निवृत्ती घेईल असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मावळ गोळीबाराच्या संदर्भात भाजपने केलेल्या आरोपांचा कडक शब्दात समाचार घेताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सध्या पोलीस यंत्रणा आहे.त्यात सीआयडी, सीबीआय सगळ्यांचा समावेश होतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतेही काम माझ्याकडून होणार नाही. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात माझे प्रशासनाशी कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल तर अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल. माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप सातत्याने होत आहेत.जे आरोप करत आहेत त्यांनीही त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवावा असे खुले आव्हान त्यांनी दिले.