पुणे-
एकीकडे जग अंतराळात गणित विज्ञानाच्या बळावर भराऱ्या मारत असताना दुसरीकडे आपण इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडत आहोत. हे अत्यंत दुर्दैवी असून आपल्या सर्व जातीय, प्रांतीय, भाषिक अस्मिता बाजूला ठेवून एक ‘ भारतीय ‘ म्हणून आता सर्व समाजापुढे आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या उद्देशाने उद्या, गुरुवारी (दि. ४) सायंकाळी पाच वाजता पुण्यात जातीयवादाचे अंतयात्रा काढण्यात येणार आहे. अलका चौक ते वैंकुठ स्मशानभूमीपर्यंत ही ‘जातीयवादाची अंत्ययात्रा’आयोजित केली आहे.
आपल्या भारतात महाराष्ट्रात मात्र इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडण्याच्या घटना घडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज , लोकमान्य टिळक, महात्मा गांधी , पंडीत नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, सुखदेव, भगतसिंग अशी कितीतरी मंडळी आपला राष्ट्रीय ठेवा व प्रेरणास्थाने आहेत. त्यांच्यावर प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. त्यांना जातीपातीची लेबलं लावणे हा करंटेपणा आहे. दुर्दैवाने सध्या ते वारंवार घडताना दिसत आहे.
आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या वर्तमान व भविष्याचा विचार न करता भुतकाळातील मुडदे उकरुन आपापसात वादविवाद व प्रसंगी मारामारी करण्याचे वाढते वेड हा होय. इतिहास हा फक्त वर्तमानात वावरताना चुका टाळणे व स्फुर्तीदायी घटनांपासून प्रेरणा घेऊन भविष्य घडविण्यासाठी वापरायचा असतो. पण आपण सगळेच त्या दृष्टिकोनातुन इतिहासाचा वापर करतोय का यावर शांतपणे बसून विचार करायची वेळ आली आहे.
आपल्या सर्व जातीय, प्रांतीय, भाषीक अस्मिता बाजूला ठेऊन एक ‘ भारतीय ‘ म्हणून आता सर्व समाजापुढे आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठीच जातीयवादाची अंत्ययात्रा आयोजित केली आहे. या अंत्ययात्रेला सर्वानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.