पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 जुलै ते 3 ऑगस्ट 2019 या कालावधीत अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन आज (दि. 1) महापौर मुक्ता टिळक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, निमंत्रक राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवाद पुणेचे सुनिल महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे उपस्थित होते.
संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमास शुभेच्छा देऊन महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख खूप उंचावलेला आहे. आजच्या पिढीला या महापुरुषांच्या कार्याची पुरेशी माहिती नाही. महापुरुषांचा इतिहास पुसता येत नाही, पण विस्मृतीत जाण्याची शक्यता असते. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.’’
डॉ. सदानंद मोरे यांनी महापौरांच्या वक्तव्याचा धागा पकडून महापुरुषांच्या स्मृती जागविणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी बरोबरच 1 ऑगस्ट 2019 रोजी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. या निमित्ताने दि. 31 जुलै रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग ते केसरीवाडा, टिळक रोड येथे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले.
संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषद अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्याचा संपूर्ण महाराष्ट्रात जागर करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
पुण्याच्या परंपरेला शोभेल असे कार्यक्रम घेण्याचा मानस असल्याचे निमंत्रक राजेश पांडे यांनी नमूद केले. नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत, शाहिरी अशा क्षेत्रातील विविध संस्था या उपक्रमात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनिल महाजन म्हणाले, दि. 30 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत छायाचित्र, कथा, कादंबर्या्, नाटक व इतर साहित्याचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरविण्यात येणार असून बालगंधर्व रंगमंदिरामध्ये परिसंवाद, चर्चासत्र, अभिवाचन कार्यक्रम, ऑडिओ बुक प्रकाशन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.