पुणे- निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणीही आचार संहितेचा भंग करु नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून म्हणजेच 10 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहिता म्हणजे काय याची सर्वांना माहिती आहे,तथापि, अनावधानाने आचार संहितेचा भंग होऊ शकतो, त्यामुळे कोणीही चुकूनही आचार संहितेचा भंग होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. शासकीय कार्यालय प्रमुखांनीही त्याबाबत दक्ष रहावे. आचार संहितेच्या काळात काय करु नये आणि काय करावे, याबाबत सादरीकरण करण्यात आले. एखाद्या मुद्याबाबत शंका असल्यास जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून निराकरण करुन घ्यावे, असेही राम यांनी सांगितले.