पुणे– जिल्ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून वेगळी ओळख असून जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे स्मार्ट मॉडेल म्हणून विकसित होत आहे. ‘सिध्दी 2017-संकल्प 2018’च्या माध्यमातून विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘सिध्दी 2017-संकल्प 2018’ या उपक्रमांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. काळे यांनी विविध विषयाशी संबंधित माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत ते म्हणाले, पुणे जिल्हयातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद शेतक-यांसाठी या योजनेअंतर्गत 385.57 कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली. त्यानुसार 47 हजार 78 थकबाकीदार सभासद शेतक-यांना रक्कम रु. 244.86 कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. वेळेवर कर्ज परत करणा-या 77 हजार 860 सभासद शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची रक्कम 127.83 कोटी रुपये देण्यात आली. सदरची रक्कम शेतक-यांच्या खाती वर्ग करण्याचे काम पूर्ण झाले.
पुनर्गठन केलेल्या 1,031 शेतकरी सभासदांना 4.21 कोटी रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 1 लक्ष 24 हजार 938 सभासद शेतक-यांना 372.69 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ या योजने अंतर्गत देण्यात आला. लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना एसेमेसव्दारे कळविण्यात आलेले असून मुद्दल व व्याजासह 1.50 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी 1.50 लाखावरील रक्कम भरल्यास शासनातर्फे 1.50 लाख लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी काळे यांनी स्पष्ट केले.
श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च 2016 रोजी शिखर समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी, पुणे यांनी केलेल्या आराखडयाच्या सादरीकरणात उच्चाधिकार समितीने दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल शिखर समिती समोर सादर केलेला आहे. त्याच अनुषंगाने या आराखड्यास शिखर समितीने 260.86 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी 148.97 कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सूचिबध्द प्रशिक्षण संस्था 279 असून यामध्ये7140 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी 9 हजार 810 असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.
राज्यात 1 जुलै ते 7 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यात 55 लक्ष 91 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी काळे यांनी दिली. त्यानुसार उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
झिरो पेंडन्सी उपक्रमांतर्गत 1 नोव्हेबर 2017 ते 31 डिसेंबर 2017 अखेर 2 लाख 60 हजार 64 प्रकरणांची निर्गती करण्यात आली. 31 डिसेंबर 2017 अखेर 23 हजार 512 प्रकरणे शिल्लक असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियानामध्ये 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 190 गावांची निवड करण्यात आली असून 5 हजार 855 कामांचा आराखडा तयार केलेला आहे. यापैकी 825 कामे हाती घेण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुरंदर तालुकयास मिळालेले असून राज्य पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीबाबत पुणे जिल्ह्यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.