पुणे : सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे नशीब अजमावणे कठीण झाले आहे असे असताना देखील आपले कर्तृत्व सिद्ध करणे गरजेचे आहे आणि पोलीस पाल्य हे सिद्ध करतील असा विश्वास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्यात यावा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाबरोबर आर्मी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील असा मेळावा घेण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य निवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे महाराष्ट्रात प्रथमच पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या मुला-मुलींसाठी भव्य नोकरी महोत्सव उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी अप्पर पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे, माजी पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे, माजी पोलीस उपायुक्त सीताराम न्यायनिरगुणे, माजी पोलीस उपायुक्त सुखानंद साब्दे, माजी अप्पर, पोलीस अधीक्षक शशिकांत राजहंस, माजी पोलीस उपअधीक्षक मदन चव्हाण, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा कार्यक्रमाचे आयोजक भाऊसाहेब आंधळकर, माजी सहाय्यक फौजदार दिलीप शिंदे, राजा सोनूले, संपत जाधव, सुरेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब आंधळकर म्हणाले की, महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता रोजगार समस्या सध्या भेडसावत आहे. नोकरी मिळणे कठीण झाले असून हा एक गंभीर विषय बनला आहे. याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चांगली नोकरी मिळावी यासाठी हा एक प्रयत्न संघटनेतर्फे करण्यात आला आहे. महोत्सवात आत्तापर्यंत १५००० मुलांनी उपस्थित राहून अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन पालकांसह मुलांनी हजेरी लावली. सर्वांना नोकरी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव भरवणार तसेच त्याची पूर्व सूचनाही देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.