पुणे – “ डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आधुनिक शेती पद्धतीवर भर देत शेतीचा सूक्ष्म अभ्यास केला.” असे सांगत डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अव्यक्त पैलू उलगडले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या(डिक्की) तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती व संस्थेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक व डिक्की महाराष्ट्राचे मेंटॉर अशोक खाडे, डिक्की पश्चिम विभाग उपाध्यक्ष अविनाश जगताप, डिक्की नॅशनल वुमन विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे, डिक्की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की पुणे अध्यक्ष अनिल ओव्हाळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कृतीशील अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी केवळ सिद्धांत मांडले नाहीत तर त्याचा समाजातील मोठ्या वर्गाला फायदा झाला. आपल्या देशात ब्रिटिशांचे राज्य असतानाही ईस्ट इंडिया कंपनीच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर आक्षेप घेण्याचे धारिष्ट दाखवणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होत. त्यांच्या या तपशीलवार व तौलानिक अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.
बाबसाहेबांचे आर्थिक विचारासंबधित असणारे ग्रंथ ६ हे पुस्तक आपल्यासाठी गीता, कुराण आणि बायबल इतके महान असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. तसेच बाबासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या कृषी, कर प्रणाली, सामाजिक धोरणांतून सउदाहरण त्यांनी स्पष्ट केले.
‘ज्या गावात अत्यंत खडतर परिस्थितीत दिवस काढले त्याच गावात आज माझ्या इतका यशस्वी माणूस नाही. आज माझ्या कंपनीत ३ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. तर ३ हजार कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल कंपनीची आहे. आजवर एक रुपयाचेही बँक कर्ज घेतले नाही. बाबासाहेबांच्या विचारांवर वाटचाल केली म्हणूनच हे शक्य झाले,’ अशा भावना अशोक खाडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
‘नोकरी मागणारे नाही तर देणारे व्हा’ हेच ध्येय ठेऊन डीक्की ची वाटचाल आपण करू असा नारा संस्थेच्या पदाधिकारयानी दिला. यावेळी डिक्कीच्या आजवरच्या प्रवासाची यशोगाथा उलगडणारे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
डिक्कीचा थक्क करणारा प्रवास
१४ वर्षापूर्वी पुण्यात स्थापन झालेली डिक्की संस्था आज २६ राज्यात कार्यरत आहे. उद्योग क्षेत्राशी निगडित संस्थेचे १० हजाराहून अधिक सदस्य आहेत. उद्योजकतेला वाव देण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचविण्याच्या विधायक उद्देशाने, डिक्कीने केवळ १४ वर्षात केलेली वाटचाल खरोखरच थक्क करणारी आहे.