पुणे-पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यात विकास प्रकल्पांचे जाळे निर्माण करून मुळशी साठी विकासाचा पुणे पॅटर्न वापरणार असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले. बंटाराभवन येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते. हिंजवडी, माण, बाणेर, नांदे, सूस, सुतारवाडी, महाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी हा समारंभ आयोजित केला होता. माजी खासदार नानासाहेब नवले, प्रतापराव पवार, नगरसेवक अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, हिंजवडीच्या सरपंच स्मिताताई जांभुळकर,उपसरपंच राहुल जांभुळकर, माण गावच्या सरपंच स्मिताताई जांभूळकर, उपसरपंच सपनाताई वाडकर, नांदे सरपंच बाळासाहेब रानवडे, उपसरपंच कविता माकर, सुस सरपंच अपूर्वा निकाळजे, उपसरपंच गजानन चांदेरे,महाळुंगे सरपंच तुळशीराम भांडे, उपसरपंच पांडुरंग पाडाळे, कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष सतीश पै यावेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले की , देशातील एक प्रमुख आय.टी केंद्र म्हणून हिंजवडीची ओळख आहे. हिंजवडी मधील ग्रामस्थ तसेच आयटीयन्स येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होते. ती कोंडी कमी करण्यासाठी चांदे, नांदे,मान असे पर्यायी रस्ते करण्यात येत आहेत, आम्ही हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. आता ते काम सुरु झाले आहे. ही मेट्रो सुरु करणे हे माझे स्वप्न होते. या भागाचा शाश्वत विकास करण्याचा आमचा मानस आहे. मात्र हा विकास करताना शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. असे आम्हाला वाटते. इथला शेतकरी उद्योजक व्हावा, बिल्डर व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सिंगापूरच्या कंपनी सोबत करार झाला आहे. गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना सुरु करुन या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या सूचना तसेच आमचा कालबद्ध कार्यक्रम यांचा मेळ घालून या गावांचा विकास करण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील.
प्रतापराव पवार यांनी या भागात सुरु असलेल्या विकासकामांचे कौतुक केले. गिरीश बापट हे एक कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता हा नेहमी समाजाचा विचार करत असतो. तो त्याच्या फायद्याचा विचार करत नसतो व असा विचार करणारे कार्यकर्तेच मोठे होत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी खासदार नानासाहेब नवले यांनी या भागात सुरु असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत, विकासासाठी बापट यांनी हाती घेतलेली कामे लवकर पूर्ण व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली.
हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे डॉ.सतीश पै यांनी तीन वर्षांपूर्वी हिंजवडी असोसिएशनच्या वतीने आमच्या समस्या घेऊन पालकमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, त्यातील बहुतांश समस्या सुटत आल्या आहेत. या साठी बापट यांनी प्रयत्न केल्याचे सांगून त्यांचे आभार मानले. या मुळे हिंजवडी आयटी क्षेत्रामध्ये 50 हजार नवीन नोकऱ्या तयार होतील असे ते म्हणाले .
चंद्रकांत महाराज वांजळे यांनी ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होत असताना कशा प्रकारे विकास झाला पाहिजे. याचे मूर्तिमंत उदाहरण या गावातून आपल्याला पाहायला मिळते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात 1000 कुटुंबियांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने विकासाच्या दृष्टीने सूचना मागवण्यात आल्या.
सत्कार स्वीकारण्यास बापट यांचा नकार
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येणारा सत्कार स्विकारण्यास बापट यांनी नकार दिला. सत्कार समारंभाला फाटा देऊन या भागाचा विकास करण्यासाठी भविष्यात आणखी काय करावे लागेल, याबाबत या बैठकीत ग्रामस्थांशी बापट यांनी चर्चा केली. यातून पालकमंत्र्यांची संवेदनशीलता अधोरेखित होते.