पुणे- स्वतःचा भाजप पक्ष च केवळ श्रीमंत व्हावा आणि पुढेही राहिला पाहिजे याच हेतूने नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी राबविली आणि न्यायव्यवस्था हि त्याच साठी ते वापरू पाहत आहेत असा आरोप करून मोदी सरकार घालविले नाही तर देशात आणखी त्रासदायक स्थितीला जनतेला सामोरे जावे लागेल असा इशारा आज येथे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी दिला .कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ पद्मावती येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.उमेदवार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, नगरसेवक सुभाष जगताप,युक्रांदचे संदिप बर्वे, विरेंद्र किराड, माजी महापौर कमल व्यवहारे, विजय चौधरी आदी उपस्थित होते.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, मुसलमान तसेच दलित बांधवांना भर रस्त्यात मारुन भाजपवाले आनंद साजरा करतात. गोमांसाचे कारण सांगत झुंडशाहीकडून ठेचून जीव घेतले जात आहेत. उद्या आपणासही मारण्यास हे लोक कमी करणार नाहीत. भाजपने पक्षाला श्रीमंत करण्यासाठी नोटाबंदी केली. मोदींनी न्याय व्यवस्था धोक्यात आणली. जाती-धर्मात फुट पाडण्याचे काम भाजपवाले करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव करणे आवश्यक आहे. हे सर्वसामान्यांचे नव्हे, तर भांडवलदाराचे सरकार आहे. मोदीं परत आले, तर बेरोजगारी वाढेल, त्यातून स्थलांतर वाढेल. हे थांबविण्यासाठी सरकार बदलणे हा उत्तम पर्याय आहे.
पुणे तूरडाळ, रेशनवरील धान्यांवर डल्ला मारणाचे काम भाजपच्या उमेदवारांनी केले आहे. रेशनवरील धान्य हे गोरगरिबांचा आधार असतो. मात्र या धान्यापासून शहरातील लाखो गरिबांना दूर ठेवले जात आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटणार्या भ्रष्ट भाजपची राजवट या मतदानातून उद्धवस्त करा. असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांना केले. ज्यांनी खोटे बोलून लोकांना फसविले तेच लोक आता भाजपला मतदानरूपाने फसवितील. असा सुचक इशाराही पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाले, भाजपने नोटाबंदी करून लोकांना रस्त्यावर आणले. त्यामुळे लोकच म्हणतात तुम्ही नोटाबंदी केली आम्ही व्होटबंदी करणार, हे आंधळे, बहिर्याचे सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचे हाल दिसत नाहीत. त्यांना फक्त उद्योगपतींची चिंता आहे. इथले प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालल्याने भाजपने राज्य उध्वस्त केले आहे. त्यामुळे भाजपला घरी बसविण्याची हीच एक संधी आहे. ही संधी गमावली, तर पुन्हा निवडणूकाच होणार नाहीत. मोदीं आणि शहा या दोनच व्यक्ती देश चालवित आहेत. हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली
आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपणास महाआघाडीला मतदान करायचे आहे. भाजप चौकशांची धमकी देऊन दडपशाही करीत आहे. मात्र विजय लोकशाहीचाच होईल, हे भाजपने विसरू नये. डाळ, रेशन, ओषधांची दुकाने आदींमध्ये भ्रष्टाचार करणार्याविरोधात ही निवडणूक आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. यात जनशक्तीचा निश्चितच विजय होईल.
मोहन जोशी म्हणाले, तळजाईच्या विकासाला माझे प्राधान्य असेल. सर्वसामान्य मतदार हिच माझी ताकद आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. बापट पालकमंञी आहेत. त्यांनी पाच वर्षात एकही झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प राबविला नाही.
सुभाष जगताप म्हणाले, मागच्या निवडणूकीत लोक जाहिरांतीना भुलले होते. खोटेपणाचा कळस भाजपने गाठला आहे. मात्र राज ठाकरे त्यांचा खोटेपणा लोकांसमोर आणत आहेत. खोटी आश्वासने दिली. नोकर्यांचे आमिष दाखविले. ही निवडणूक परतफेड करण्याची आहे. मोदींनी स्वतःच्या आईचेही भांडवल केले. मोदींमुळे देश मागे पडतोय. शरद रणपिसे, उल्हास पवार, श्रीनिवास जगताप यांनी भाषण केले.
भाजपने शहराचा खेळखंडोबा केलाय
पुणेकरांनी मागील पाच वर्षात पार पडलेल्या निवडणूकांत भाजपला मतदान केले. मात्र त्याच पुणेकरांना आता एका ना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शंभर नगरसेवक, आठ आमदार, दोन खासदार, एक मंत्री असताना शहरात पाणी नाही. येत्या काळात दोन ते तीन दिवसांनंतर पाणी मिळणार असल्याचे संकेत आहेत. आघाडी सरकारच्या काळात पुणेकरांना कधी पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले नव्हते. मात्र भाजपने पाण्यावरून पुणेकरांची कोंडी केलीआहे. भरभरून मते दिली असतानाही पाणी कपात होतेच कशी याचा जाब पुणेकर भाजपवाल्यांना विचारणार की नाही? असा सवालही हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.